बुधवार, २६ जून
शेतकऱ्यांचे फसवणूक टाळण्यासाठी भरारी पथकाच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यात कृषी केंद्रांची तपासणी केली जात आहे. या तपासणी दरम्यान त्रुटी आढळून आलेल्या ३५ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कृषी विभाग ॲक्शन मोडवर आल्याचे बोलले जाते.
यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या दृष्टीने पेरणीची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभाग सतर्क झाला आहे. भरारी पथकांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात कृषी सेवा केंद्रांवर नजर ठेवली जात असून या सेवा केंद्रांची तपासणी केली जात आहे.
बाजारपेठेत कपाशी, सोयाबीनसह कडधान्य पिकांच्या बियाणांना मोठी मागणी आहे. यामुळे बियाणांचा काळाबाजार करत चढ्या दराने विक्री केली जात आहे. याबाबतच्या तक्रारी देखील वाढल्या आहेत. कृषी विभागाला प्राप्त तक्रारीनुसार आणि अचानक भेटीद्वारे कृषी विभाग कृषी केंद्राची तपासणी होत असून दोषी आढळलेल्या कृषी सेवा केंद्र चालक-मालकांवर कारवाई केली जात आहे.
भरारी पथकाच्या तपासणी दरम्यान गेल्या महिनाभरात ३५ कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच १३ पेक्षा अधिक केंद्रांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात २ ठिकाणी थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी जिल्ह्यात १५ भरारी पथकाची स्थापना देखील करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे यांनी दिली आहे.