गुरुवार, ११ जुलै, अहमदनगर
राज्यात कृषी आणि फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, संस्था आणि गटांना विविध पुरस्कार राज्य शासनाकडून देण्यात येतात. यावर्षीच्या पुरस्कारासाठी शासनाने शेतकऱ्यांसह संस्था आणि गटाकडून प्रस्ताव मागविले आहे.
यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार, जिजामाता कृषीभूषण पुरस्कार, सेंद्रिय शेती कृषीभूषण पुरस्कार, उद्यान पंडीत पुरस्कार, वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, युवा शेतकरी पुरस्कार आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कारांचा समावेश आहे.
२०२३ या वर्षासाठी हे अर्ज (प्रस्ताव) मागविण्यात आले असून शेतकरी, गट आणि संस्थेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत २५ जुलै पर्यंत आहे. यासाठी संबंधितांनी आपल्या लगतच्या तालुका कृषी कार्यालयात प्रस्ताव सादर करावेत.
तसेच अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन अहमदनगर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे.