मंगळवार, ३० जुलै
विशेष प्रतिनिधी / मुंबई – राज्यातील उद्योगधंदे हे त्या राज्यातील तरुण-तरुणी यांच्या हाताला काम देतात. रोजगार देतात. परिणामी त्या राज्यातील बेकारी कमी होऊन तरुणांच्या हाताला रोजगार मिळतो. मात्र कोरोनाच्या महामारीनंतर म्हणजे महाविकास आघाडी सरकारमध्ये आणि महायुतीच्या सरकारमध्ये जुलै २०२० ते जुलै २०२४ या मागील चार वर्षांत राज्यातील बारा हजार लघुउद्योग बंद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राज्यात मागील अडीच वर्षांपासून महायुतीचे सरकार आहे. या अडीच वर्षांत राज्यातील अनेक उद्योगधंदे हे परराज्यात गेले. गुजरातमध्ये उद्योगधंदे पळवल्याची ओरड विरोधकांकडून होत आहे आणि हे सरकार गुजरात धार्जिने, महाराष्ट्र विरोधी असल्याची टीका विरोधकांकडून होत होती.
मात्र या अडीच वर्षातच नाही तर त्याआधीही म्हणजे महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेक सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग बंद झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील लघुउद्योग बंद होण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारची उदासीनता दिसून येत आहे. हे लघु उद्योग सुरू राहावेत म्हणून मविआ किंवा महायुतीचे सरकार पुढाकार घेत नाही का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
देशात ४९ हजार लघुउद्योग बंद पडले…
दुसरीकडे देशपातळीवर विचार केला तर गेल्या चार वर्षांत संपूर्ण देशात ४९ हजार ३४२ सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग बंद पडले आहेत. या बंद पडलेल्या उद्योगधंद्यामुळे लाखो लोकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. लाखो लोकं बेरोजगार झाले आहेत. या बेरोजगारीचा आकडा पाहिला तर लाखोंच्या घरात आहे. या उद्योगधंद्यामुळे साडेतीन लाख लोकांना रोजगार मिळाला होता. परंतु देशपातळीवरही सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग बंद झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात कामगारांना नोकरी गमवावी लागली आहे.
एकट्या महाराष्ट्रात ४९ हजार पैकी १२ हजार सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग बंद पडले आहेत. धक्कादायक म्हणजे, या १२ हजार बंद पडलेल्या लघु उद्योगांमध्ये महाराष्ट्रातील ५ लाख ४ हजारच्यावर कामगारांची संख्या होती. गेल्या चार वर्षांत राज्यात आणि देशात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे बंद झाले आहेत. जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा राज्यात उद्योगधंदे येत होते. मात्र अडीच वर्षांपूर्वी राजकीय भूकंप झाला, राजकीय उलथापालथ झाली त्यावेळी ज्या आमदारांनी बंड केले ते सुरुवातीला गुजरातमध्ये गेले होते आणि तिथून पुढे त्यांनी सरकार स्थापन केलं.
सरकारमध्ये आल्यानंतर अनेक उद्योगधंदे यांनी गुजरातला पळवले, गुजरातला नेले. त्यामुळं महाराष्ट्रातील अनेक उद्योगधंदे ठरवून गुजरातला नेले आहेत. यावरून हे सरकार गुजरातधार्जिणं असल्याची टीका शिवसेना (ठाकरे गट) प्रवक्ता आयोध्या पोळ यांनी केली केली आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्योगधंद्यामध्ये अत्यंत वाईट अवस्था होती. चार वर्षांपूर्वी कोरोना होता. मविआ सरकारमध्ये राज्यातील विकास ठप्प झाला होता. परंतु अलीकडच्या काळात महायुती सरकारने अनेक उद्योगधंदे राज्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात अधिक गुंतवणूक आणि उद्योगधंदे कसे येतील, यासाठी हे सरकार प्रयत्नशील असल्याचं भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलं.