रविवार, २३ नोव्हेंबर
लोकसभा निवडणुकीवेळी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादाची परिणती आपसातील हाय व्होल्टेज लढतींवर झाली होती. काही मतदारसंघात कौटुंबिक लढती रंगल्या होत्या. बारामतीमध्ये थेट सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत रंगली होते. तर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना पुतण्या युगेंद्र पवार यांच्याशी सामना करावा लागला.
राज्यात विधानसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल समोर आल्यानंतर प्रत्येक जण आपापल्यापरीने कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार जिंकला, किती मितं मिळाली, कोणता उमेदवार पडला, बलाढ्य उमेदवारांचं काय झालं, कौटुंबिक लढतींचं काय झालं, हाय व्होल्टेज लढतींचं काय झालं? या मागची कारण शोधत त्यावर विश्लेषण करत आहे.
मात्र अशाच एका लढतीची उत्सुकता अजित पवार यांच्या विधानामुळे राज्याला लागली होती. ती लढत शिरूर मतदार संघात बघावयास मिळाली. या मतदारसंघातील आमदाराला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीवेळी जाहीर आव्हान दिलं होतं. त्यामुळे शिरूर मतदारसंघात ‘त्या’ आमदाराचं काय झालं? विधानसभेचा निकाल काय लागला हे बघूयात.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी ९ मे २०२४ रोजी अजित पवार यांची शिरूर लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा पार पडली होती. या सभेत बोलताना अजित पवार यांनी शरद पवार गटाचे शिरूरचे आमदार अशोक पवार यांना खुलं आव्हान दिलं होतं. “अरे पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो, मंत्री होतो काय?”, अशा आपल्या शैलीत आव्हान दिलं होतं. त्यांच्या त्या वक्तव्याची बरीच चर्चा झाली होती.
त्यामुळे विधानसभा निवडणुकीत अजितदादांनी आव्हान दिलेले अशोक पवार जिंकले की पराभूत झाले? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. शनिवारी (२३) रात्री या प्रश्नाचं उत्तर मिळालं. शिरूरमध्ये अशोक पवार पराभूत झाले आहेत. अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांनी अशोक पवारांचा ७४,५५० मतांनी पराभव केला आहे. कटके यांना १,९२,२८१ मतं मिळाली, तर अशोक पवारांना १,१७,७३१ मतं मिळाली आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी दिलेला आव्हान खरं करून दाखवील असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे.