विशेष प्रतिनिधी | मुंबई
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत गंभीर आणि चिंताजनक प्रकार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता ५८.२२ टक्के मतदान झालं, त्याच रात्री ११.३० वाजता ते ६५.०२ टक्के तर दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबर रोजी हेच मतदान ६६.०५ टक्के कसं झालं असा सवाल प्रदेश काँग्रेसने निवडणूक आयोगाला विचारला आहे.
व्हिडिओ फुटेज जाहीर करा – ही वाढ चक्क ७.८३ टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. तब्बल ७६ लाख मतांची ही वाढ असून मतदानाचा टक्का कसा वाढला? असा प्रश्न उपस्थित करून निवडणूक आयोगाने जिथे मतदान वाढले त्या केंद्राचे व्हिडीओ फुटेज जाहीर करावे, असे आव्हान काँग्रेसने आयोगाला दिलं आहे.
आयोगाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह – निवडणूक आयोगाने जनतेच्या मतांवर दरोडा टाकला आहे, असा आरोप करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाला आरोपीच्या कोठडीत पकडलं आहे. पक्षाच्या विधानसभा उमेदवारांची बैठक टिळक भवन येथे पार पडली. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना नाना पटोले यांनी मतांची आकडेवारी देत निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावार प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
ते म्हणाले, मतदानाच्या दिवशी ५ वाजल्यानंतर मतांची टक्केवारी वाढल्याचं प्रमाण पाहता मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या असल्या पाहिजेत. राज्यातील किती मतदार संघावर अशा रांगा लागल्या होत्या ते निवडणूक आयोगाने पुराव्यासह दाखवावं. निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावर सीसीटीव्ही लावले होते, त्याचं चित्रिकरण दाखवावं. मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन माहिती देत असतं, यावेळी आयागाने पत्रकार परिषद का घेतली नाही. वाढीव मतांबद्दल देशभरातील विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींनी शंका उपस्थित केल्या आहेत.
लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी – यामुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून राजकीय पक्ष, उमेदवार आणि इतरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देणं निवडणूक आयोगाचं कर्तव्य आहे. काँग्रेस पक्षाचा पराभव झाला म्हणून नाही तर लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस पक्ष मतदानाच्या टक्केवारीतील तफावतीचा मुद्दा लावून धरत आहे.
लोकशाहीची थट्टा – भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोगाने संगनमताने लोकशाहीची क्रूर थट्टा केली आहे. विधानसभा निवडणुकीतील मतांच्या तफावतीसंदर्भात काँग्रेस पक्ष न्यायालयीन व रस्त्यावरची लढाई लढेल, असा इशाराही नाना पटोले यांनी दिला आहे.