संगमनेर, दि. ०६ फेब्रुवारी –
निवडणुकांमध्ये जय पराजय होत असतात. परंतु सातत्याने जनतेच्या विकासासाठी काम करणारे नेतृत्व हे जनतेच्या हृदयात असते. अत्यंत स्वच्छ प्रतिमा आणि प्रामाणिकपणे सातत्याने काम करणारे लोकनेते बाळासाहेब थोरात हे राजकारणातील संत असल्याचे गौरवोद्गार साहित्यिक संजय कळमकर यांनी काढले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालय येथे सह्याद्री संस्थेच्या आजी-माजी पदाधिकारी पालक व सेवकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात, संस्थेचे चेअरमन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, सेक्रेटरी लक्ष्मणराव कुटे, लहानुभाऊ गुंजाळ, डॉ. सोमनाथ सातपुते, साहेबराव कवडे, नानासाहेब गुंजाळ, सिताराम वर्पे, सेक्रेटरी दत्तात्रय चासकर, रजिस्टर आचार्य बाबुराव गवांदे, प्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी वाढदिवसानिमित्त लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे केक कापून अभिष्टचिंतन करण्यात आले.
कळमकर म्हणाले, जनतेसाठी जीवन समर्पित करणारे नेते हे जनतेच्या हृदयात असतात. अहमदनगर जिल्ह्याचे सुपुत्र बाळासाहेब थोरात यांनी आपल्या कर्तुत्वाने राज्यात तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नाव पोहोचविले. अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पडताना त्या खात्यांना लोकाभिमुख बनवले. संगमनेर तालुका हा जिल्ह्यात नव्हे तर राज्यात विकसित बनवला. निवडणुकीत पराजय होत असतात परंतु समाजासाठी झटणारे लोकनेते हे जनतेच्या हृदयात असतात.
याचबरोबर सध्याचे जीवन हे धावपळीचे झाले असून जुन्या काळामध्ये जी जवळीक होती ती आता सोशल मीडियाच्या जमान्यांमध्ये राहिली नाही. यावेळी जुने आणि नवीन यामधील अनेक फरक सांगताना त्यांनी सर्वांना खळखळून हसवले.
बाळासाहेब थोरात म्हणाले, शिक्षण हे समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. आपण शिक्षण मंत्री पदाच्या काळात या विभागातील अडचणी जवळून पाहिल्या आणि जास्तीत जास्त अडचणी सोडवल्या. याचबरोबर मूलभूत शिक्षणाचा अधिकार हा हक्क राबविला. आगामी काळातही शिक्षणातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी संघटितपणे आपल्याला काम करावे लागणार आहे. सह्याद्री संस्थेने गुणवत्तेने काम केल्यामुळे अनेक गुणवंत विद्यार्थी या ठिकाणी निर्माण झाली असून तालुक्याच्या शैक्षणिक वाटचालीत सह्याद्री संस्थेचे मोठे योगदान आहे.
डॉ. तांबे म्हणाले, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर हे शैक्षणिक केंद्र ठरले आहे. सह्याद्री संस्थेने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकरता सातत्याने विविध उपक्रम राबवले आहेत. आगामी काळामध्ये शिक्षणातील नवीन प्रणालींबरोबर विविध कंपन्यांशी टाईप आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सह्याद्री कटिबद्ध आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबुराव गवांदे यांनी केले. प्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ यांनी आभार मानले.