संगमनेर, दि. २४ मार्च – प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील चिकणी गावात वन जमिनीच्या बेकायदेशीर नोंदी करून जमिनी हडपण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. या प्रकरणी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करत त्या सहा व्यापाऱ्यांच्या नावावर नोंद करण्यात आलेल्या व महसुली दस्तऐवज असलेल्या सातबारावरील अवैध नोंदी रद्द केल्या आहेत. तसेच, या प्रकरणात दोषी आढळलेल्या संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत महसूल विभागाच्या सूत्रांनी दिले आहेत.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील चिकणी गावात सुमारे ८० हेक्टर वन जमिनीवर काही व्यापाऱ्यांनी महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने बेकायदेशीर नोंदी केल्या होत्या. या नोंदींच्या आधारे सदर जमीन हडपण्याचा त्यांचा प्रयत्न होता. या प्रकारातून राज्यभरात गाजलेल्या मुळशी पॅटर्नची पुनरावृत्ती होत असल्याचे दिसत होते.
मात्र, ही बाब माजी महसूल तथा विद्यमान पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, महसूल विभागाने तत्काळ पावले उचलत अवैध नोंदी रद्द केल्या आहेत.

या प्रकरणी महसूल विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात दोषी आढळलेल्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. तसेच, या प्रकरणात सामील असलेल्या व्यापारी आणि शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल.
या घटनेमुळे संगमनेर तालुक्यात शासकीय जमिनींच्या बेकायदेशीर नोंदी करण्याचे प्रकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यापूर्वीही तालुक्यात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे महसूल विभागाने अधिक सतर्क राहून शासकीय जमिनींचे संरक्षण करणे आवश्यक बनले आहे. दरम्यान या घोटाळ्याप्रकरणी संबंधित बड्या धेंडांवर काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.
शासनाच्या, गोरगरिबांच्या, शर्ती अटींच्या, बक्षीस, अहस्तांतरणीय जमिनींची लुटमार करण्याचा प्रकार संगमनेर तालुक्यात सुरू आहे. शासनाच्या जमिनीसह राखीव आणि गोरगरिबांच्या जमिनी देखील इथल्या राजकीय पुढारी, निवृत्त अधिकारी, डेव्हलपर्स, बिल्डर्स, उद्योजक मंडळींनी घशात घातल्या आहेत. फॉरेस्ट जमिनीवर डोळा ठेवून या जमिनी परस्पर खरेदी विक्री व्यवहार करून किंवा या जमिनीवर भोगवटादार नाव लावून घेऊन नंतर त्या जमिनीचा मालक होण्याचे उद्योग राजकीय वरद हस्तामुळे संगमनेरमध्ये झाले आहेत.आता मात्र संगमनेर वर विशेष लक्ष केंद्रित केलेल्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यात लक्ष घातल्याने हे प्रकरण शेवटपर्यंत जाते का याकडे देखील लक्ष लागले आहे.


