महाराष्ट्र संवाद न्यूज – अकोले
अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक येथे काल दुपारी (दि. ७ मे) एक दुर्दैवी घटना घडली. वादळी वाऱ्यामुळे कोल्हार घोटी रस्त्यालगत असलेले एक मोठे झाड अचानक कोसळले. या दुर्घटनेत शिवाजी विश्वनाथ वाकचौरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, काल दुपारी बाराच्या सुमारास कळस परिसरात पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. शेतात असलेले कांदे झाकण्यासाठी शिवाजी वाकचौरे (वय अंदाजे ६० वर्षे) आपल्या मोटारसायकलवरून त्यांच्या सुनेसोबत जात होते. त्याचवेळी जोरदार वाऱ्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेले एक मोठे महारुखचे झाड त्यांच्या अंगावर पडले.
या अपघातात त्यांच्या सुनेला कोणतीही दुखापत झाली नाही, तर शिवाजी वाकचौरे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना तातडीने संगमनेर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
आज (दि. ८ मे) कळस येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि नातेवाईक उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे कळस परिसरात शोककळा पसरली आहे.