संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज):
संगमनेर तालुक्यामध्ये बिबट्यांची मोठी दहशत सुरू असतानाच एका दुर्मिळ घटनेत नर आणि मादी बिबट्याची जोडी वनविभागाच्या पिंजऱ्यात एकाच वेळी अडकल्याची घटना घडली आहे. मिलनाच्या उद्देशाने एकत्र आलेली ही जोडी जेरबंद झाल्याने परिसरात या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे.
मिर्झापूर (संगमनेर) येथील ‘गणेश मळा’ परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर वाढला होता. काही दिवसांपूर्वीच एका बिबट्याने शेतकऱ्याच्या दुभत्या जनावरावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले होते. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत वनविभागाने या परिसरात पिंजरा लावला होता.
बुधवारी (१७ डिसेंबर) पहाटेच्या सुमारास, भक्ष्याच्या शोधात किंवा मिलनाच्या ओढीने आलेले हे नर-मादी बिबट्यांचे जोडपे वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकले. सहसा एका पिंजऱ्यात एकच बिबट्या अडकतो, मात्र एकाच वेळी ही जोडी जेरबंद झाल्याने वनविभागाचे अधिकारीही अवाक झाले आहेत.
डिसेंबर ते मार्च: बिबट्यांचा विणीचा काळ- वन्यजीव अभ्यासकांच्या मते, बिबट्यांचा कोणताही निश्चित असा प्रजनन काळ नसला तरी, डिसेंबर ते मार्च हा काळ त्यांच्या प्रजननासाठी अत्यंत अनुकूल मानला जातो. याच काळात नर आणि मादी एकत्र फिरताना दिसतात. जेरबंद झालेले हे दोन्ही बिबट्या अंदाजे दीड वर्षांचे असून, ते शिकार करण्यास सक्षम आहेत.
मिर्झापूर परिसरात बिबट्यांची दहशत- मिर्झापूरसारख्या लहान गावात १५ ते १७ बिबट्यांचा वावर असावा, अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. ग्रामीण भागात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकरी आणि शाळकरी मुलांमध्ये भीतीचे सावट आहे.
दिवसाढवळ्या बिबटे दर्शन देत असल्याने आम्हाला घरची दारे बंद करून राहावे लागते, अशी व्यथा स्थानिक शेतकरी साहेबराव वलवे यांनी व्यक्त केली.
वनविभागाची कार्यवाही- पहाटे ही जोडी पिंजऱ्यात अडकल्याची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही बिबट्यांना सुरक्षितपणे ताब्यात घेतले असून, त्यांची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.
प्रणयाराधन पडले महागात! संगमनेरमध्ये नर-मादी बिबट्याची जोडी एकाच पिंजऱ्यात जेरबंद
सहसा एका पिंजऱ्यात एकच बिबट्या अडकतो, मात्र एकाच वेळी ही जोडी जेरबंद झाल्याने वनविभागाचे अधिकारीही अवाक झाले आहेत.








