देशातील शिक्षण व्यवस्थेतील वाढती अनियमितता, परीक्षांमधील गोंधळ आणि विद्यार्थीविरोधी धोरणांमुळे तरुण वर्गात तीव्र असंतोष पसरला आहे. या सर्व प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी संगमनेर येथे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद केल्यानुसार, सध्या देशातील शिक्षण क्षेत्रात विविध गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित प्रश्न, विविध स्पर्धा परीक्षांमधील अनियमितता आणि विद्यार्थीहिताच्या मागण्यांकडे केंद्र सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. प्रशासनाच्या या उदासीन धोरणामुळे देशभरातील विद्यार्थी आणि युवकांमध्ये संतापाची लाट आहे.
आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी लोकशाही व संविधानिक मार्गाने शांततापूर्ण आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही आणि पूर्ण शांतता राखली जाईल, असे आश्वासन यावेळी प्रतिनिधींनी दिले. सदर निवेदन केंद्र सरकार व संबंधित सक्षम प्राधिकरणाकडे तातडीने पाठवून या गंभीर विषयाची दखल घ्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
हे निवेदन देतेवेळी अरुण चव्हाण, राम अरगडे, ॲड. समिर लामखडे, संदीप काकड, मोहसीन शेख, शुभम शिंदे, ओंकार बिडवे, अमोल शेलकर, अनिल गुंजाळ आणि सूर्यकांत शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.