Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: श्रीराम फायनान्सकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याचा चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी समशेरपूर (ता. अकोले) येथील कर्जदाराला संगमनेर येथील न्यायालयाने सहा महिने कारावास आणि चेकच्या दुप्पट रक्कमेसह ९ टक्के व्याजाचा दंड ठोठावला आहे. मुदतीत दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीला अतिरिक्त सहा महिने कारावास भोगवावा लागणार आहे.
संगमनेर येथील तिसरे वरिष्ठ व अतिरिक्त न्यायदंडाधिकारी पी. बी. जोशी यांच्या न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. समशेरपूर येथील आरोपी संजय भाऊराव सावंत यांनी श्रीराम फायनान्स लिमिटेड, शाखा संगमनेर कडून कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी त्यांनी दिलेला धनादेश बँकेत अनादरित (बाऊन्स) झाला. यानंतर कायदेशीर मुदतीत रक्कमेची परतफेड न केल्यामुळे फायनान्स कंपनीने आरोपीविरुद्ध न्यायालयात कलम १३८ अन्वये केस क्र. ४६४/२०१५ दाखल केली होती.
न्यायालयाने दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आणि गुणदोष विचारात घेऊन आरोपी संजय सावंत यास सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच चेकच्या दुप्पट रक्कम दंडाच्या स्वरूपात एक महिन्याच्या आत फायनान्स कंपनीस देण्याचे आणि ती रक्कम देईपर्यंत ९ टक्के दराने व्याज भरण्याचे आदेश दिले. ही रक्कम मुदतीत न दिल्यास आरोपीस आणखी सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागेल.
या खटल्यात फिर्यादी श्रीराम फायनान्स कंपनीच्या वतीने ॲड. राजू बबनराव खरे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. विजय देवगिरे, ॲड. स्नेहा गोडसे, ॲड. सुहास गोर्डे आणि ॲड. वैष्णवी राजू खरे यांनी कायदेशीर सहकार्य केले.