नेवासा तहसील कार्यालयाच्या आवारात भरदुपारी वकिलावर गोळ्या झाडून त्यांची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी अहिल्यानगर जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी ऐतिहासिक निकाल दिला आहे. नेवासा येथील कुख्यात लष्करे टोळीतील प्रवीण पोपट खरचंद, मोहन सुरेश लष्करे (फरार), रामेश्वर भगवान गाढे, चौरंगीनाथ गोरक्षनाथ लष्करे, पवन सोमनाथ नरुल्ला, सचिन चंदू चव्हाण आणि सादिक बशीर शेख या ७ आरोपींना मरेपर्यंत जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावण्यात आली.
तर कटाचा थेट व पुरेसा पुरावा न मिळाल्याने अशोक जालिंदर जगताप, सत्यवान धनराज सोनकांबळे उर्फ लष्करे, विलास पोपट जिरे, सोपान भगवान गाढे आणि सुनील उर्फ सोन्या मोहन परदेशी या ५ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी हा निकाल दिला असून सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांनी काम पाहिले.
नेवासा येथील वकील रियाज पठाण यांनी औरंगाबाद जिल्हा न्यायालयात अण्णा लष्करे खून प्रकरणात साक्ष दिली होती. या खटल्यात न्यायालयाने त्यांना फितूर (हॉस्टाइल) घोषित केले होते. या संदर्भातील बातम्या वृत्तपत्रांत छापून आल्यानंतर, अण्णा लष्करे टोळीतील सदस्यांना वाटले की ॲड. पठाण हे फिर्यादीच्या बाजूने बोलले आहेत. याच रागातून त्यांनी पुण्यातील तुरुंगात असलेल्या सोपान गाढे व त्याच्या साथीदारांच्या मदतीने वकील रियाज पठाण यांच्या हत्येचा कट रचला.
दिनांक १६ सप्टेंबर २०१३ रोजी दुपारी पावणेतीन ते तीनच्या सुमारास ॲड. रियाज पठाण हे नेवासा येथील तहसील कार्यालय, पोलीस ठाणे व नोंदणी उपनिबंधक कार्यालयाच्या आवारात एका लिंबाच्या झाडाखाली दस्त नोंदणीचे काम करत बसले होते. त्यावेळी आरोपींनी त्यांच्यावर पाळत ठेवली होती. आरोपी प्रवीण खरचंद याने पाठीमागून येऊन ॲड. पठाण यांच्यावर पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या. त्याच्या इतर तीन सहकाऱ्यांनी पठाण यांचे दोन्ही हात घट्ट धरून ठेवले होते, तर उर्वरित आरोपी त्यांना गोळ्या झाडण्यासाठी चिथावणी देत होते.
या घटनेनंतर पठाण रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. उपस्थित प्रत्यक्षदर्शी असिफ शेख व इतरांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलवले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, घटनेनंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुख्य आरोपी प्रवीण खरचंद याला नेवासा पोलिसांनी घटनास्थळीच पिस्तुलासह रंगेहात पकडले होते.
असिफ पठाण यांच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गाजलेल्या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण २९ साक्षीदार, तर बचाव पक्षातर्फे ३ साक्षीदार तपासण्यात आले. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मांडलेला भक्कम युक्तिवाद आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीच्या आधारे न्यायालयाने ७ आरोपींना दोषी ठरवत मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी पक्षाला वकील परिमल फळे आणि पैरवी अधिकारी तथा पोलीस हवालदार महेश जोशी यांनी सहकार्य केले.