महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
मुंबई / संगमनेर:
संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात चुकीची आणि अपूर्ण माहिती दिल्याप्रकारणी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने दिलेला निर्णय कायम ठेवताना, सर्वोच्च न्यायालयाने खताळ यांची विशेष अनुमती याचिका फेटाळून लावली आहे. या निर्णयामुळे खताळ यांच्याविरोधात उच्च न्यायालयात रीतसर खटला चालण्याचा मार्ग मोकळा झाला असून, त्यांची आमदारकी थेट धोक्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीदरम्यान अमोल खताळ यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपली व्यावसायिक भागीदारी, उत्पन्न आणि कराची थकबाकी लपवल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला होता. थोरात यांच्या बाजूने वकील ॲड. अमित कारंडे यांनी न्यायालयात मुद्दा मांडला की, खताळ यांची ‘नीलकमल’ नावाची भागीदारी संस्था असून त्याचा ५४ हजार रुपयांचा व्यावसायिक कर थकीत होता आणि ही माहिती प्रतिज्ञापत्रात लपवण्यात आली. यावर खताळ यांनी आपण या फर्मचे भागीदार नसून ती विसर्जित झाल्याचा दावा केला होता. मात्र, थोरात यांच्या वकिलांनी जीएसटी संकेतस्थळावरील अधिकृत नोंदी सादर करत ही फर्म अद्याप सक्रिय असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
याप्रकरणी खताळ यांनी थोरात यांची याचिका सुरुवातीलाच रद्दबातल ठरवण्यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता, परंतु न्यायमूर्ती किशोर संत यांच्या खंडपीठाने तो फेटाळून लावला. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात खताळ यांनी तातडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, मात्र तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवताना स्पष्ट केले की, नियमानुसार लहान किंवा मोठी थकबाकी असली तरी कायदेशीर कारवाई निश्चित होईल.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात या प्रकरणावर नियमित सुनावणी व खटला चालणार आहे. थोरात यांचे वकील ॲड. अमित कारंडे यांनी सांगितले की, निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवणे हा गंभीर गुन्हा असल्याने पुढील सहा महिन्यांत या प्रकरणाचा निकाल येणे अपेक्षित आहे आणि सर्व पुरावे पाहता अमोल खताळ यांची निवड रद्द होईल असा विश्वास आहे.
चार दशकांहून अधिक काळ संगमनेर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बाळासाहेब थोरात यांचा पराभव करून अमोल खताळ आमदार झाले होते, मात्र आता निवडणूक प्रतिज्ञापत्रातील त्रुटी आणि थकबाकीच्या मुद्द्यावर कायदेशीर कचाट्यात सापडल्याने त्यांची आमदारकी कायम राहणार की रद्द होणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या संदर्भातील वृत्त विविध वृत्तवाहिन्यांनी दिले आहे.






