जगातील सर्वात उंच ठिकाणी असलेल्या हिमाचल प्रदेशातील प्रसिद्ध ‘हिक्किम’ पोस्ट ऑफिसमधून भारताच्या पंतप्रधानांना एक थेट पत्र पाठवण्यात आले आहे. वाढती असहिष्णुता, नफरत आणि सामाजिक विभाजनाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी संगमनेर येथील वकिल समीर लामखडे यांनी पत्राद्वारे केली आहे.
देशात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करत संगमनेरमधील वकिलाने लिहिलेलं हे पत्र चर्चेत आलं आहे. भारताच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांची हमी दिली आहे. मात्र, सध्या देशात ज्या प्रकारे असहिष्णुता आणि नफरतीचे वातावरण पसरत आहे, तसेच लोकशाही संस्थांच्या स्वायत्ततेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक अत्यंत चिंतित झाले आहेत.
या सर्व घडामोडींची नैतिक जबाबदारी थेट देशाच्या प्रमुखांनी घेतली पाहिजे, असा युक्तिवाद या पत्रातून करण्यात आला आहे. संविधानाची मूल भावना कमकुवत करणाऱ्या आणि सामाजिक ताणतणाव वाढवणाऱ्या या वातावरणाला आळा घालण्यासाठी पंतप्रधान मोदींनी स्वतःहून पदमुक्त व्हावे, अशी स्पष्ट मागणी या पत्रात नोंदवण्यात आली आहे.
जगातील सर्वाधिक उंचीवर वसलेल्या हिक्किम पोस्ट ऑफिसमधून हे पत्र थेट पंतप्रधानांच्या कार्यालयाकडे रवाना करण्यात आले आहे.