बालवयातच आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर प्रचंड हालअपेष्टा, बहिष्कार आणि अपमान सहन करूनही अजिबात निराश न होता जगाला आशेची संजीवनी देणारे संत ज्ञानेश्वर माऊली हेच आजच्या युगातील युवकांचे खरे आदर्श असायला हवेत, असे प्रतिपादन कीर्तन-प्रवचनकार ह.भ.प. रोहिणीताई परांजपे यांनी केले.
श्रावण मासानिमित्त राजस्थान युवक मंडळाच्या वतीने आयोजित ‘मनःशांती व जीवनविकास’ या पाचव्या सलग व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पात मालपाणी लॉन्सच्या उत्सव सभागृहात त्या बोलत होत्या.
‘विश्व स्वधर्म सूर्य पाहो’ या विषयावर आधारित सुमारे दीड तासांच्या रसाळ व ओघवत्या प्रवचनातून त्यांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. संतांचे विचार ही आयुष्यभर पुरणारी शिदोरी असल्याचे सांगत, माणसाजवळ आर्थिक धनासोबत विचारांचे धन असेल तरच तो खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकतो, हे त्यांनी विविध संतांच्या ओव्या व अभंगांच्या दाखल्यांमधून स्पष्ट केले.
आयुष्यातील कडवट अनुभव पचवून माऊलींनी संपूर्ण विश्वाला नैराश्य, वैफल्य आणि नकारात्मकतेवर मात करणारा ‘ग्रंथराज ज्ञानेश्वरी’ हा अमृतमय ग्रंथ दिला असून प्रत्येकाने या विनामूल्य उपलब्ध ज्ञानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
नारदीय कीर्तन परंपरेनुसार सादर केलेल्या या कीर्तनात त्यांनी अनेक भजनांचे सुमधुर गायन केले. तसेच मालपाणी परिवाराच्या लाखो वृक्षलागवडीसारख्या सामाजिक उपक्रमांचे विशेष कौतुक केले. कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’ या रचनेने कीर्तनाची सांगता झाली, याला उपस्थितांनी उभे राहून उत्स्फूर्त दाद दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भगवान शंकराच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नगरसेविका रचना मालपाणी यांच्या हस्ते रोहिणीताई परांजपे यांचा सत्कार झाला. प्रास्ताविकातून मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी यांनी आयोजनामागील भूमिका मांडली. कार्याध्यक्ष सागर मणियार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर सूत्रसंचालन ओम इंदाणी यांनी केले. या सोहळ्याला उपाध्यक्ष कल्पेश मर्दा, सचिव कृष्णा आसावा, खजिनदार वेणुगोपाल कलंत्री यांच्यासह संगमनेरमधील नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.