राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या यशोधन जनसंपर्क कार्यालयाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तालुक्यातील असंघटित आणि घरेलू कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या एका वर्षात तब्बल ८ हजार ६०० कामगारांच्या बँक खात्यावर विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून १० कोटी १६ लाख रुपयांचा निधी थेट वर्ग करण्यात आला असल्याची माहिती इंद्रजीत थोरात यांनी दिली.
बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील सर्वांगीण विकासासोबतच गोरगरीब, निराधार, वृद्ध नागरिक व विधवा महिलांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. याच उद्देशाने यशोधन कार्यालयात असंघटित व घरेलू कामगारांसाठी एक स्वतंत्र आणि अद्ययावत विभाग सुरु करण्यात आला असून, तिथे चार पूर्णवेळ कर्मचारी कार्यरत आहेत. मागील सहा वर्षांच्या काळात या विभागाच्या माध्यमातून सुमारे १६ हजार ५२७ नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला आहे.
गेल्या आर्थिक वर्षात या विभागामार्फत कामगारांचे अर्ज भरण्यापासून ते त्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती, मयत कामगारांचा विमा, अपघाती विमा, मुलींच्या विवाहासाठी आर्थिक मदत आणि वैद्यकीय उपचारांचा खर्च अशा विविध प्रस्तावांचा यशस्वी पाठपुरावा करण्यात आला. या प्रयत्नांमुळेच ८,६०० कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपयांची रक्कम जमा झाली आहे. संपूर्ण राज्यात संगमनेर तालुक्यात या योजनेचा सर्वाधिक लाभ मिळाला असून, यशोधन कार्यालयाच्या या कार्यपद्धतीमुळे सर्वसामान्य कामगारांच्या जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या मदतीबद्दल कामगारांनी बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, इंद्रजीत थोरात व डॉ. जयश्रीताई थोरात यांचे आभार मानले आहेत.
मंजूर झालेला निधी यशोधन कार्यालयाच्या प्रयत्नांचेच फलित: संजय कोल्हे
दरम्यान, असंघटित कामगार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय कोल्हे यांनी स्पष्ट केले की, संगमनेर तालुक्यातील कामगारांना मिळालेली आर्थिक मदत, भांडी व इतर सर्व शासकीय सुविधा या केवळ यशोधन कार्यालयातून भरलेल्या अर्जांमुळेच मंजूर झाल्या आहेत. प्रत्यक्ष काम न करता केवळ श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून कामगारांनी सावध राहावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.