महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: ‘जेन झी’ ही आपल्या राष्ट्राची मोठी संपत्ती व शक्ती असून, प्रगतीची पालखी या युवाशक्तीच्या बलशाली खांद्यांवरच पुढे न्यायची आहे. त्यामुळे तरुणाईने शिव्यांची नव्हे तर संतांच्या ओव्यांची संगत धरावी, असे आवाहन कीर्तनकार ह.भ.प. रोहिणीताई परांजपे यांनी केले.
राजस्थान युवक मंडळाच्या वतीने श्रावण मासानिमित्त मालपाणी लॉन्सच्या उत्सव सभागृहात आयोजित ‘मन:शांती व जीवनविकास व्याख्यानमाला’ सलग पाचव्या वर्षी सुरू असून, या व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी ‘विश्व स्वधर्म सूर्ये पाहो’ या विषयावर त्या बोलत होत्या. या दीड तासाच्या कीर्तनाला श्रोत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. संतांच्या आणि महापुरुषांच्या विचारांचा वारसा
व्याख्यानादरम्यान परांजपे यांनी भारतीय संस्कृती आणि इतिहासातील महान व्यक्तींचे दाखले दिले. अवघ्या ३९ वर्षांचे आयुष्य लाभलेले स्वामी विवेकानंद यांनी विवेकातून जगाला ‘वसुधैव कुटुंबकम’चा संदेश दिला. तेजस्विता, तत्परता आणि तन्मयता ही तारुण्याची लक्षणे असल्याचे सांगत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, लोकमान्य टिळक, चाफेकर बंधू, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि समर्थ रामदास स्वामी यांचे स्मरण केले. या सर्व महापुरुषांनी तरुणपणातच ध्येय निश्चित करून आपले आयुष्य देव, देश आणि धर्मासाठी समर्पित केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विवेकानंदांच्या विचारांप्रमाणे तरुणांनी उठावे, जागे व्हावे आणि आपले ध्येय साध्य करावे, असे त्या म्हणाल्या. संत साहित्याचा आणि जीवनमूल्यांचा संदेश
भर्तृहरी, शुकदेव, महर्षी व्यास यांच्यापासून ते संत ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानकाका, मुक्ताई, संत एकनाथ आणि जगद्गुरू तुकोबाराय यांसारख्या संत-महंतांच्या उपदेशामृताचा भावार्थ त्यांनी रसिकांना उलगडून दाखवला. प्रत्येक गोष्टीवर संशय घेणाऱ्या माणसाला कधीही सुख लाभत नाही, त्यामुळे संशय सोडत प्रभूला शरण जावे, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. घरातील माता-पिता हेच विठ्ठल-रुक्मिणी असून ते सर्वश्रेष्ठ तीर्थ आहेत; त्यांना रोज नमस्कार करण्याची सवय तरुणांनी लावून घेतल्यास त्यांच्या आशीर्वादाने आयुष्यात कधीही कमतरता भासणार नाही, असे त्यांनी आवर्जून सांगितले. देशभक्तीपर गीते आणि उत्साही वातावरण
कीर्तनाच्या ओघात सादर करण्यात आलेल्या ‘येरे बा विठ्ठला’, शिवतांडव स्तोत्र आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘जयोस्तुते’ या गीतांमुळे सभागृहात अंगावर रोमांच उभे करणारे वातावरण निर्माण झाले. या आवेशपूर्ण सादरीकरणानंतर हजारो श्रोत्यांनी ‘भारत माता की जय’ व ‘वंदे मातरम’चा गगनभेदी जयघोष केला. कार्यक्रमाची सुरुवात संपूर्ण वंदे मातरमच्या सामूहिक गायनाने झाली. संगमनेरच्या श्रोत्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे श्रावणातच संत विचारांची दिवाळी साजरी झाल्याचा अनुभव उपस्थितांनी घेतला. या कार्यक्रमासाठी राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी, कार्याध्यक्ष सागर मणियार, उपाध्यक्ष कल्पेश मर्दा, कृष्णा आसावा, वेणुगोपाल कलंत्री यांच्यासह मालपाणी परिवारातील सुवर्णा मालपाणी, राजेश मालपाणी, डॉ. संजय मालपाणी, रचना मालपाणी आणि संगमनेरच्या विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.