महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर :
संगमनेर तालुक्यातील पठारभागातील कौठे मलकापूर येथे प्रस्तावित औद्योगिक वसाहतीसाठी सरकारी गट क्रमांक १६२ मधील १०.८३ हेक्टर शासकीय जमीन हस्तांतरित करण्याच्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या जमिनीवर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत प्रस्तावित असलेल्या सौरऊर्जा प्रकल्पाला स्थगिती देण्याचे थेट आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना दिले आहेत. या निर्णयामुळे कौठे मलकापूर येथील औद्योगिक वसाहतीच्या उभारणीचा मार्ग पूर्णपणे सुकर झाला असून, पठारभागातील हजारो स्थानिक तरुणांच्या रोजगाराच्या अपेक्षांना मोठे बळ मिळाले आहे.
आमदार खताळ यांच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कौठे मलकापूर परिसरात एकूण २२७.५३ हेक्टर क्षेत्रावर भव्य औद्योगिक वसाहत प्रस्तावित आहे. यामध्ये सरकारी गट क्रमांक १६२ मधील १०.८३ हेक्टर शासकीय जमिनीचा समावेश आहे. मात्र, हीच जमीन मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सौरऊर्जा प्रकल्पासाठी देण्याची प्रशासकीय कार्यवाही सुरू झाली होती. औद्योगिक वसाहतीचे नियोजन आधीपासून असताना ही जमीन सौर प्रकल्पाकडे वर्ग करण्याच्या निर्णयाला स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला होता. कौठे मलकापूर ग्रामसभेने या सौर प्रकल्पास अधिकृत नामंजुरी दिली होती. तसेच ही जागा औद्योगिक क्षेत्रासाठीच योग्य असल्याचे स्पष्ट करत तहसीलदारांनीही सौर प्रकल्पाला विरोध दर्शवला होता. ग्रामस्थांना पूर्वकल्पना न देता काम सुरू झाल्याने स्थानिकांनी आंदोलनही छेडले होते.
स्थानिकांचा विरोध आणि संगमनेरच्या औद्योगिक विकासाची गरज लक्षात घेऊन आमदार अमोल खताळ यांनी या विषयात गांभीर्याने लक्ष घातले. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्र देऊन, संबंधित १०.८३ हेक्टर जमीन सौरऊर्जा प्रकल्पा ऐवजी औद्योगिक वसाहतीसाठी हस्तांतरित करण्याची आग्रही मागणी केली. आमदार खताळ यांच्या या मागणीची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्र्यांनी सौर प्रकल्पाच्या कार्यवाहीला स्थगिती देण्याचे आदेश दिले. यामुळे सौर प्रकल्पाची प्रक्रिया थांबली असून, आता ही जमीन औद्योगिक वसाहतीसाठी वापरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कौठे मलकापूर येथे औद्योगिक वसाहत साकारल्यास या भागात नवउद्योजक, नवीन उद्योग आणि मोठ्या गुंतवणुकीला चालना मिळणार आहे. यामुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊन पठारभागातील अर्थव्यवस्थेला गती मिळेल. संगमनेरच्या विकासाच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
“संगमनेरच्या औद्योगिक विकासाला प्राधान्य देत स्थानिकांच्या हिताचा निर्णय व्हावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. सौरऊर्जा प्रकल्पाऐवजी औद्योगिक वसाहतीसाठी जमीन उपलब्ध होणे ही संगमनेरच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे. या निर्णयासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानतो.” — अमोल खताळ, आमदार.





