खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया खताची टंचाई भासू नये, यासाठी आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनुसार कृषी विभागाने ३५७ मेट्रिक टन युरियाचा संरक्षित बफर स्टॉक विक्रीसाठी खुला केला आहे. कृषी विभागाच्या या नियोजनामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेसे खत उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आमदार खताळ यांच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, चालू खरीप हंगामासाठी तालुक्याला एकूण ७०० मेट्रिक टन युरियाचा साठा मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ३४९ मेट्रिक टन युरिया त्वरित उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र, सध्या शेतीकामांचा वेग वाढल्याने युरियाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही बाब लक्षात घेऊन खताळ यांनी शिल्लक साठा तात्काळ खुला करण्याचे आदेश कृषी अधिकाऱ्यांना दिले होते.
दरम्यान, खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या किंवा ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दराने विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्र चालकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश आमदार खताळ यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांना फक्त अधिकृत विक्रेत्यांकडूनच योग्य दरात युरिया मिळावा आणि कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी कृषी विभागाने विशेष दक्षता घेण्याचे सांगण्यात आले आहे.