Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन –

संगमनेर तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या पडलेल्या प्रदीर्घ खंडामुळे तब्बल ३३ हजार ७९२ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असून, संकटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आमदार अमोल खताळ पाटील यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे केली आहे.

तालुक्यात मका, सोयाबीन, बाजरी आणि विविध कडधान्यांची मोठ्या प्रमाणावर पेरणी झाली होती. सुरुवातीला पावसाने दिलेली साथ आणि पिकांची झालेली उत्तम उगवण यामुळे शेतकरी आशावादी होते; परंतु त्यानंतर पावसाने दगा दिल्यामुळे पिके कोमेजून जळण्याच्या मार्गावर आहेत. पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम झाल्याने यंदा उत्पादनात मोठी घट येण्याची भीती निर्माण झाली असून, यामुळे शेतकरी भीषण आर्थिक संकटात सापडला आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत आमदार खताळ यांनी मुख्यमंत्र्यांशी प्रत्यक्ष चर्चा केली. पावसाचा झालेला फटका आणि संभाव्य नुकसान याचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक नियुक्त करावे, अशी मागणी त्यांनी केली. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पीक पाहणी व पंचनामे केल्यास नुकसानीची खरी परिस्थिती शासनासमोर येईल आणि त्यानुसार नुकसानभरपाईचा निर्णय घेणे शक्य होईल, याकडे त्यांनी लक्ष वेधले. उत्पादन खर्च वाढलेला असतानाच पिके हातातून जात असल्याने शासनाने त्वरित आढावा घेऊन नुकसानभरपाई आणि आवश्यक सवलती द्याव्यात, असा आग्रह त्यांनी धरला.

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील चार कृषी मंडलांतील ८३ हजार ७४१ हेक्टर क्षेत्रापैकी तब्बल ४०.३५ टक्के म्हणजेच ३३ हजार ७९२.५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यामध्ये कोकणगाव कृषी मंडलात सर्वाधिक फटका बसला असून २५ हजार ४८२ हेक्टरपैकी १६ हजार २०० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. याशिवाय साकूर मंडलात २२ हजार १४ हेक्टरपैकी १० हजार ३४६ हेक्टर, घारगाव मंडलात १६ हजार ८०७ हेक्टरपैकी ६ हजार १११.५ हेक्टर, तर संगमनेर कृषी मंडलात १९ हजार ४३८ हेक्टरपैकी १ हजार १३५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना पावसाच्या खंडाचा मोठा फटका बसला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Share.
Leave A Reply