महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: राज्याचे गोदावरी व कृष्णा खोरे जलसंपदा मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी नाशिक-पुणे रेल्वे मार्गासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे संगमनेर तालुक्यासह संपूर्ण परिसरातील नागरिकांच्या भावना दुखावल्या असून, त्यांच्या या वक्तव्याचा नाशिक-पुणे रेल्वे कृती समितीने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.
समितीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक-पुणे रेल्वे हा लाखो नागरिकांच्या विकासाशी थेट जोडलेला अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. अशा गंभीर आणि तांत्रिक प्रश्नावर वस्तुनिष्ठ भूमिका मांडण्याऐवजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी साईबाबांच्या नावाचा आधार घेत शिर्डी मार्गाला विरोध करणाऱ्यांवर अप्रत्यक्ष दडपण आणण्याचा प्रयत्न केला आहे.
“शिर्डी रेल्वेला विरोध करणाऱ्यांवर साईबाबा कोपतील” अशा आशयाचे विधान करणे हे केवळ दुर्दैवी नसून लोकशाही मूल्यांना हरताळ फासणारे आहे. राज्यघटनेवर निष्ठा ठेवणाऱ्या एका लोकप्रतिनिधीकडून विकासाच्या मुद्द्याला धार्मिक स्वरूप देणे आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी भाषा वापरणे हे जबाबदार पदाला शोभणारे नाही, असे कृती समितीने स्पष्ट केले आहे.
साईबाबांनी आपल्या हयातीत सदैव ‘श्रद्धा आणि सबुरी’चा संदेश दिला असून त्यांनी कधीही मतभिन्नता असलेल्यांबद्दल द्वेष वा सूडाची भावना व्यक्त केली नाही. त्यामुळे साईबाबांच्या शिकवणीचा वापर करून नागरिकांना इशारे देणे हे त्यांच्याच विचारांचा अवमान करण्यासारखे आहे. संगमनेरच्या नागरिकांची भूमिका ही कोणत्याही धार्मिक स्थळाच्या वा शहराच्या विरोधात नसून, संगमनेरला न्याय मिळावा आणि तांत्रिक, आर्थिक व भौगोलिकदृष्ट्या योग्य असाच मार्ग निश्चित व्हावा अशीच आहे. मात्र या जनभावनेचा आदर करण्याऐवजी धार्मिक भावना पुढे करून मुख्य विषय भरकटवला जात असल्याची खंत समितीने व्यक्त केली आहे.
याप्रकरणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आपल्या विधानाबाबत तातडीने स्पष्टीकरण देऊन संगमनेरकरांची दिलगिरी व्यक्त करावी, अशी ठाम मागणी कृती समितीने केली आहे. अन्यथा नाशिक-पुणे रेल्वे प्रश्नावर जनआंदोलन अधिक तीव्र करण्याचा आणि आंदोलनाची धार कोणत्याही परिस्थितीत बोथट होऊ न देण्याचा निर्वाणीचा इशाराही देण्यात आला आहे.
हे निवेदन समितीचे समन्वयक सतीश खताळ, रवींद्र हासे, प्रवीण हासे, रामेश्वर पानसरे, प्रितम साबळे, प्रशांत पानसरे, सनी अभंग, अनिल राऊत, अजय हासे, शिवाजी जगताप, विजय उदावंत, अमोल शेलकर, शिवाजी गुंजाळ, निलेश गुंजाळ, प्रकाश कडलग, समीर लामखडे, राहुल गायकर, मोहसीन शेख, निलेश गुंजाळ, अनिल गुंजाळ, संदीप काकड, डॉ. सचिन वाळे, ॲड. अनिल गोडसे, राम अरगडे, आनंद खतोडे, अरुण चव्हाण, ओंकार बिडवे, सत्यजित थोरात, प्रदीप हासे आणि प्रवीण काकड आदींनी दिले आहे.