श्रावण मासाचे औचित्य साधून संगमनेर येथे राजस्थान युवक मंडळाच्या वतीने मालपाणी लॉन्स येथील उत्सव सभागृहात २२ ते २५ ऑगस्टदरम्यान चार दिवसीय ‘मनःशांती आणि जीवनविकास’ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचा संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी आणि कार्याध्यक्ष सागर मणियार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
या व्याख्यानमालेच्या पहिल्या टप्प्यात, म्हणजेच शनिवार २२ आणि रविवार २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ ते ९.०० या वेळेत महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार, प्रवचनकार आणि समाजप्रबोधनकार ह.भ.प. रोहिणीताई परांजपे यांचे सुमधुर प्रवचन होणार आहे.
त्यानंतर सोमवार २४ आणि मंगळवार २५ ऑगस्ट रोजी प्रख्यात प्रेरक व्याख्याते आणि गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी हे ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील तिसऱ्या आणि चौथ्या अध्यायाचे आपल्या रसाळ शैलीत निरुपण करणार आहेत. मागील वर्षी श्रावण महिन्यात त्यांच्या ‘ज्ञानेश्वरी भावयात्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमात पहिल्या व दुसऱ्या अध्यायावर आधारित भावार्थ सादर करण्यात आला होता, ज्याला हजारो श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता.
सभागृहात श्रोत्यांसाठी खुर्च्यांची विशेष व्यवस्था करण्यात आली असून सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य आहे. नागरिकांनी चारही दिवस सहकुटुंब उपस्थित राहून या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, अशी विनंती आयोजकांनी केली आहे.
या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपाध्यक्ष कल्पेश मर्दा, सचिव कृष्णा आसावा, खजिनदार वेणुगोपाल कलंत्री, सहसचिव दर्शन भंडारी, सहखजिनदार सीए शुभम राठी हे प्रमुख पदाधिकारी सक्रिय सहभाग नोंदवत आहेत. तसेच, कार्यकारिणी सदस्य गिरीश मालपाणी, मधुसूदन नावंदर, राजकुमार बिहाणी, मनीष मणियार, नितीन लाहोटी, आशिष राठी, सुमित अट्टल, गौरव राठी, सचिन पलोड, प्रतीक पोफळे, ओंकार इंदाणी, पवन करवा, उमेश कासट, कल्याण कासट, गणेश लाहोटी, रोहित मणियार, सम्राट भंडारी, व्यंकटेश लाहोटी, प्रथम खटोड, सिद्धांत झंवर आणि शुभम आसावा हे सर्व कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत.