महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर
संगमनेर – संगमनेरच नव्हे तर राज्यातील बहुचर्चित आणि येथील समृद्ध सहकार विश्वाला काळीमा फासणाऱ्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या तब्बल 81 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित करत या प्रकरणी दाखल असलेल्या सर्वच अर्जांची सुनावणी एकाच वेळी घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे राजकीय विश्वात प्रतिष्ठित म्हणून वावरणाऱ्या जिल्हा परिषदेचा माजी सदस्य असलेल्या व या प्रकरणातील मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
तपास जैसे थे: पतसंस्थेच्या अपहार प्रकरणी गुन्हा दाखल होतात तत्कालीन तपास अधिकारी संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी बँकेच्या व्यवस्थापकासह पाच आरोपींना अटक केली होती. हे पाचही आरोपी अद्यापही कोठडीत आहेत. दरम्यान या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी अहमदनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविल्यानंतर या प्रकरणात अद्याप फारशी प्रगती होऊ शकली नाही.
सरकारी वकिलांनी म्हणणे दिले: मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे याने संगमनेरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी स्वतंत्र व उर्वरित आरोपी कुटुंबीयांचा एकत्रित रित्या असे दोन स्वतंत्र अर्ज केले आहे. याशिवाय या प्रकरणातील अन्य एक आरोपी अरुण बुरुड यांच्यावतीने देखील अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जांवर शुक्रवारची (8 सप्टेंबर) तारीख ठेवण्यात आली होती. शुक्रवारी या तीनही अर्जासंदर्भात सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी सरकार पक्षाच्यावतीने म्हणणे दाखल केले आहे.
कोठडीतील 2 आरोपींचाही जामिनासाठी अर्ज: याशिवाय कोठडीत असलेल्या दोघा आरोपींनी जामीनासाठी न्यायालयाकडे अर्ज केला आहे. या अर्जावर देखील सरकारचे म्हणणे मागविण्यात आले असून या प्रकरणात मुख्य आरोपी बँकेचा चेअरमन भाऊसाहेब कुटे याच्या अटकपूर्व विरोध करणारा त्रयस्थ व्यक्तीचा अर्ज देखील न्यायालयाने दाखल करून घेतला आहे.
मुख्य आरोपीच्या अडचणीत वाढ: जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश मनाठकर यांच्यासमोर या प्रकरणी दाखल असलेल्या अर्जांची सुनावणी सुरू आहे. शुक्रवारी झालेल्या कामकाजावेळी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब राठोड, पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड उपस्थित होते. न्यायालय काही महत्त्वाच्या कामकाजात व्यस्त असल्याने दाखल असलेल्या सर्व अर्जांची सुनावणी एकाच वेळी घेणार असल्याचे न्यायालयाने सांगितले. न्यायालयाने घेतलेल्या या निर्णयामुळे या अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी भाऊसाहेब कुटे याच्या अडचणीत वाढ झाली आहे.
अन्य आरोपी अद्यापही बाहेरच…
गुन्हा दाखल होऊन वीस दिवसांचा कालावधी उलटून गेला असला तरी या प्रकरणातील सुरुवातीचे पाच आरोपी वगळता अन्य सर्व आरोपी अद्यापही बाहेरच आहे. आरोपींचे राजकीय वजन आणि राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांसोबत, अधिकाऱ्यांसोबत असलेले संबंध लक्षात घेता पोलिस यंत्रणा दबावाखाली काम करत असल्याचे बोलले जात आहे. प्रतिष्ठित कदम कुटुंबीयांसह अन्य आरोपींना अटक होत नसल्याने पोलीस तपासाबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.


