महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
केंद्रातील हुकूमशाही आणि गर्विष्ठ सरकारला देशातील तरुणाईने पुरते नमवले आहे. विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्यानंतर पेटून उठलेल्या या संघर्षापुढे झुकत केंद्र सरकारला शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावाच लागला. या ऐतिहासिक यशाचे संगमनेरमध्ये काँग्रेससह सर्व समविचारी व पुरोगामी पक्षांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. देशातील लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी व केंद्र सरकारला जाब विचारण्यासाठी आता संपूर्ण तरुणाई सज्ज झाली आहे, असा घणाघाती इशारा संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी दिला.
दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या २८ दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर अभूतपूर्व यश मिळाले. संगमनेर बस स्थानक परिसरात शहर व तालुका युवक काँग्रेस, छात्र भारती, ठाकरे शिवसेना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सत्यशोधक समाज, दलित पॅंथर, शेतकरी संघटना, एनएसयूआय, महिला संघटना आणि विविध पुरोगामी विद्यार्थी संघटनांच्या वतीने एकत्र येत या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दर्शवण्यात आला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी धडकताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करत आणि गुलाल उधळत मोठा आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्ला चढवताना डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, शिक्षण व्यवस्थेत माजलेला भ्रष्टाचार आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन तरुण जंतर-मंतरवर २४ तास ठिय्या मांडून होते. मात्र, निगरगट्ट केंद्र सरकारने त्यांच्या रास्त मागण्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. एवढेच नव्हे तर २० जुलै रोजी अमानुषपणे लाठीहल्ला घडवून आणत हे आंदोलन दडपण्याचा प्रकार केला.
या हल्ल्यात अनेक तरुण-तरुणी गंभीर जखमी झाले. केंद्र सरकारला अत्यंत उशिरा जाग आली असली तरी तरुणांच्या अभेद्य एकजुटीने या गर्विष्ठ सरकारला गुडघे टेकण्यास भाग पाडले आहे. शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा ही केवळ पहिली पायरी असून अजूनही अनेक मुख्य प्रश्न कायम आहेत, त्याविरोधात हा लढा असाच चालू राहील.
माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनीही केंद्र सरकारच्या क्रूर धोरणांवर जोरदार ताशेरे ओढले. त्या म्हणाल्या की, रस्त्यावर उतरलेले हे विद्यार्थी कोणत्या एका पक्षाचे कार्यकर्ते नव्हते, तर ते या देशाचे उज्ज्वल भवितव्य होते. भर पावसात रस्त्यावर झोपलेल्या या मुला हालहाल झाले, मुलींचा छळ झाला. इंग्रज अधिकारीसुद्धा ज्या पद्धतीने वागले नसतील, त्याहून अधिक क्रूरपणे हे केंद्र सरकार वागले आहे. पण देशातील जागृत तरुणाईने या हुकूमशाही सरकारला त्यांची खरी जागा दाखवून दिली आहे.
या जनआंदोलनाच्या विजयाप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख अमर कतारी, रंजना गवांदे, तुषार पानसरे आणि शेखर सोसे यांनीही केंद्र सरकारच्या तरुणविरोधी धोरणांचा चांगलाच समाचार घेतला.
‘झेन झी’ चा संगमनेरमध्ये एल्गार! – शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा होताच संगमनेरमधील ‘झेन झी’ म्हणजेच तरुण पिढीने रस्त्यावर उतरून मोठा जल्लोष केला. फटाक्यांच्या दणदणाटात आणि ‘झेन जी जिंदाबाद’च्या गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. आगामी काळात देशाची लोकशाही आणि राज्यघटना धोक्यात आणणाऱ्या प्रत्येक ताकदीविरोधात एकत्र येऊन असाच लढा तीव्र करू, असा निर्धार यावेळी उपस्थित युवकांनी व्यक्त केला.





