राज्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक आधीच हवालदिल झाले असताना, महावितरण विभागाने सुरू केलेल्या मनमानी लोड शेडिंगमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या गलथान कारभाराविरोधात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत महावितरण कार्यालयावर शुक्रवारी धडक दिली. सायंकाळी ६ ते ९ या वेळेत कोणतीही लोड शेडिंग न करता पूर्ण दाबाने वीज पुरवठा सुरू ठेवावा, या मुख्य मागणीचे निवेदन काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना सुपूर्द केले.
यावेळी बोलताना युवक काँग्रेस अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी लोड शेडिंगमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर आणि सुरक्षिततेवर होणाऱ्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधले. सायंकाळी शाळा सुटून घरी परतताना अंधार असल्याने हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्याचा धोका वाढतो, तसेच याच वेळेत शेतकरी बांधवांना दुग्ध व्यवसाय व गोठ्याची कामे करावी लागतात. त्यामुळे सायंकाळी ६ ते ९ या वेळेत वीजपुरवठा खंडित करू नये, असा इशारा त्यांनी दिला.
सणासुदीचे दिवस जवळ आले असताना लोड शेडिंगमुळे नागरिकांच्या आनंदावर विरजण पडत असल्याचे दुर्गाताई तांबे म्हणाल्या. सरकारने वेळेत, पूर्ण वेळ आणि योग्य दाबाने वीज पुरवणे ही त्यांची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर पांडुरंग पाटील घुले यांनी महायुती सरकारवर टीका करत, मोफत विजेची घोषणा फक्त कागदावरच राहिल्याचा आरोप केला. तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांनी महागाई, बेरोजगारी आणि लोड शेडिंगच्या मुद्द्यावरून तीव्र संताप व्यक्त करत, वीज पुरवठा तत्काळ सुरळीत न झाल्यास रस्ता रोको करून उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
या आंदोलनात दुर्गाताई तांबे, पांडुरंग पाटील घुले, डॉ. जयश्रीताई थोरात, अजय फटांगरे, शरद नाना थोरात, बुवाजी बाबा पुणेकर, कैलास पानसरे, रमेश गुंजाळ, शिवाजी जगताप, विठ्ठल गुंजाळ, नरेंद्र गुंजाळ, सिताराम राऊत, योगेश पोकळे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयाबाहेर सरकार व प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.