Annat Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन
संगमनेर:
संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे बिबट्याच्या भीतीने पळताना शनिवारी शेततळ्यात पडून ११ वर्षीय कृष्णा वसंत पवार या बालकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. यापूर्वीही याच परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एका लहान मुलाला आपला जीव गमवावा लागला होता. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र घबराट व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी शिवछत्रपती ERT टीमचे जवान नवनाथ सिनारे आणि प्रशांत पांडे यांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. सुमारे अर्धा तास अथक प्रयत्न केल्यानंतर दोन्ही जवानांना मृतदेह शोधण्यात यश आले आणि तो पाण्यातून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी संगमनेरच्या घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
जवळे कडलग आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. संध्याकाळच्या सुमारास बिबट्याच्या भीतीने पळ काढताना कृष्णाचा तोल जाऊन तो शेततळ्यात पडला आणि त्यातच त्याचा करुण अंत झाला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. सातत्याने घडणाऱ्या या घटनांमुळे वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
या घटनेवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. जयश्री थोरात यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. जवळे कडलग येथील ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल चिंता व्यक्त केली. वनविभागाने व प्रशासनाने या घटनेची तातडीने दखल घेऊन परिसरात तातडीने पिंजरे लावावेत आणि बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे.
बाळासाहेब थोरात यांनी कृष्णाच्या शोकाकुल कुटुंबाप्रति संवेदना व्यक्त करत शासनाने मृत बालकाच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक मदत व नियमानुसार नुकसानभरपाई देण्याची मागणीही केली आहे. वारंवार सूचना देऊनही वनविभाग ठोस उपाययोजना करत नसल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, प्रशासनाने आतातरी गांभीर्याने पावले उचलून ग्रामीण भागातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सुरक्षा प्रदान करावी, असा सूर सर्व स्तरातून उमटत आहे.
संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथे आज एक हृदयद्रावक घटना घडली. बिबट्या मागे लागल्याने जीव वाचवण्यासाठी धावत असलेल्या ११ वर्षीय कृष्णा वसंत पवार या मुलाचा शेततळ्यात पाय घसरून पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे जवळे कडलग परिसरात हळहळ व्यक्त होत असून, बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने परिसरात तातडीने पाहणी करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. – अमोल शेलकर, कार्याध्यक्ष संगमनेर तालुका काँग्रेस.






