अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्याच्या सरहद्दीवर पारेगाव बुद्रुक येथील अश्विनाथ गडावर परिसरातील लाखो भाविकांच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीने आज गुरुवारी मोठ्या उत्साहात यात्रा पार पडत आहे. हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र येऊन साजरी होणारी ही यात्रा सामाजिक एकतेचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
यात्रेनिमित्त निमोण येथे अश्विनाथ गडावर जाणाऱ्या मानाच्या काठीचे पूजन बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आर्किटेक्ट बी. आर. चकोर, सोमनाथ धोंडीबा घुगे, ज्ञानेश्वर धोंडीबा घुगे, ॲड. ज्ञानेश्वर सांगळे, चंद्रकांत घुगे, साहेबराव मंडलिक यांच्यासह विविध मान्यवर आणि युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत निमोण गावातून पारंपारिक वाद्यांच्या साथीने भव्य मिरवणूक काढण्यात आली.
अश्विनाथ डोंगर हा पारेगाव बुद्रुक, चिंचोली गुरव, पिंपळे, निमोण, देवकवठे आणि सिन्नर तालुक्यातील निऱ्हाळे, घोटेवाडी, कहांडळवाडी या सर्व गावांच्या मध्यवर्ती असलेले मोठे श्रद्धास्थान आहे. श्रावणातील तिसऱ्या गुरुवारी येथे भव्य जत्रा भरते. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतून हिंदू बांधव तर उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव या ठिकाणी येतात. चिंचोली गुरव व पारेगाव बुद्रुकच्या ग्रामस्थांकडून देवाचा गाडा (रथ) बैलगाडीने ओढत मिरवला जातो. हा क्षण यात्रेचे मुख्य आकर्षण असतो.
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, आपल्या देशाचे वैशिष्ट्य विविधतेतून एकता हे आहे. नाशिक आणि अहिल्यानगरच्या सीमेवरील हे तीर्थक्षेत्र परस्पर आदर, सहिष्णुता आणि एकात्मतेचा संदेश देते. मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी दिलेल्या निधीमुळे हे आता धार्मिक व पर्यटन स्थळ म्हणून विकसित झाले आहे.
आर्किटेक्ट बी. आर. चकोर यांनीही मनोगत व्यक्त करताना सांगीतले की, बाळासाहेब थोरात आणि सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या निधीमुळे या परिसराचा कायापालट झाला असून हे दोन्ही जिल्ह्यांचे महत्त्वाचे पर्यटन केंद्र बनले आहे. यात्रेत तरुण, महिला आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक वातावरणात हा उत्सव साजरा केला.