खरीप हंगामातील पिकांची वाढती गरज आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर बनलेला प्रश्न विचारात घेऊन संगमनेर तालुक्यातील लोहारे-कासारे पाझर तलावातून पाणी सोडण्यात आले आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या मागणीची तातडीने दखल घेत आमदार अमोल खताळ यांनी लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने पाणी सोडण्याचे निर्देश दिले होते. या आदेशानुसार प्रशासनाने त्वरीत कार्यवाही करत पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
लोहारे-कासारे परिसरात गेल्या काही दिवसांपासून खरीप पिकांना पाण्याची अत्यंत गरज भासत होती. तसेच नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही बिकट झाला होता. यामुळे संतप्त व अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी आमदार अमोल खताळ यांची भेट घेऊन तलावातून पाणी सोडण्याची मागणी केली होती. या समस्येचे गांभीर्य ओळखून आमदार खताळ यांनी तात्काळ लघु पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून पाणी सोडण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे तलावाचे दरवाजे उघडण्यात आले असून, यामुळे खरीप पिकांना संजीवनी मिळण्यासोबतच विहिरींची भूजल पातळी वाढून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे.
पाणी सोडण्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीमुळे लोहारे-कासारे आणि लगतच्या परिसरात समाधानाचे वातावरण पसरले आहे. संकटाच्या काळात केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कारवाई करून पाण्याचा प्रश्न सोडविल्याबद्दल स्थानिक शेतकऱ्यांनी आमदार खताळ आणि पाटबंधारे विभागाचे आभार मानले आहेत.
अडचणीच्या वेळी लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासने न देता प्रशासनाकडून निर्णय प्रत्यक्षात आणणे गरजेचे असते. लोहारे-कासारे येथील पाझर तलावातून तातडीने पाणी सोडल्यामुळे पिकांना ऐन वेळी मोठा आधार मिळाला असून, परिसरातील पाण्याचे दुर्भिक्ष कमी होण्यास मदत झाली आहे.