संगमनेर पालिकेचा अनोखा उपक्रम! १ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणार प्रभागनिहाय बैठका; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या प्रश्नांना थेट व्यासपीठ
अशी माहिती पालिका गटनेत्या दीपाली पंचारिया यांनी दिली.
नागरिकांना आपल्या परिसरातील समस्या आणि अडचणी थेट प्रशासनासमोर मांडता याव्यात तसेच त्यावर तत्परतेने तोडगा काढता यावा, यासाठी संगमनेर नगरपालिकेच्या वतीने १ ते २५ सप्टेंबर या कालावधीत प्रभागनिहाय बैठकांचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या सूचनेनुसार राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमामुळे संगमनेरकरांना आपल्या हक्काच्या व्यासपीठावरून थेट प्रश्न मांडण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती पालिका गटनेत्या दीपाली पंचारिया यांनी दिली.
हा कोणताही नेहमीचा ‘जनता दरबार’ नसून, शहरातील प्रत्येक प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी तयार केलेले एक सक्षम कार्यचौकट आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, पथदिवे, ड्रेनेज आणि कचरा व्यवस्थापनासारख्या दैनंदिन नागरी समस्यांवर संबंधित प्रभागातील नगरसेवक आणि पालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत थेट चर्चा केली जाईल. नागरिकांनी केवळ तक्रारी न सांगता प्रश्नांची यादी व आवश्यक कागदपत्रांसह या बैठकीला उपस्थित राहावे, जेणेकरून त्या प्रश्नांची नोंद घेऊन प्रत्यक्ष कामाची दिशा तातडीने निश्चित करता येईल.
नागरिकांनी तक्रारी घेऊन पालिका कार्यालयाचे खेटे घालण्यापेक्षा अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी स्वतः नागरिकांच्या दारात पोहोचून प्रश्न समजून घ्यावेत, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. १ ते २५ सप्टेंबर दरम्यान चालणाऱ्या या मोहिमेत सर्व प्रभागांतील नागरिकांनी आपल्या परिसरातील समस्या घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि या लोककल्याणकारी उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.