संगमनेर तालुक्यातील पठार भागातील डोळासणे परिसरातील नागरिकांच्या निवासी वीज जोडणीचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. आमदार अमोल खताळ पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत ओटीएसपी (OTSP) योजनेतून निवासी वीज जोडणीसाठी १० लाख १ हजार ७९७ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. विशेष म्हणजे निधी मंजूर होताच प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाल्याने गेल्या चार दशकांपासून वीजेची वाट पाहणाऱ्या डोळासणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पठार भागातील डोळासणे परिसरातील अनेक कुटुंबांना गेल्या चाळीस वर्षांपासून हक्काच्या निवासी वीज जोडणीपासून वंचित राहावे लागत होते. स्थानिक नागरिकांची ही मूलभूत गरज ओळखून आमदार अमोल खताळ पाटील यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष सहकार्याने आणि शासनस्तरावरील प्रभावी पाठपुराव्यामुळे हा निधी तातडीने मंजूर करून घेण्यात त्यांना यश मिळाले आहे.
या कामामुळे परिसरातील अनेक कुटुंबांच्या घरात आता कायमस्वरूपी प्रकाश पोहोचणार आहे. जे काम मागील चाळीस वर्षांत केवळ आश्वासनांपर्यंत मर्यादित राहिले, ते काम आमदार अमोल खताळ यांनी आमदारकीच्या अवघ्या एका वर्षात प्रत्यक्ष पूर्ण करून दाखवल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.
मागील चाळीस वर्षांत केवळ आश्वासने आणि चर्चाच झाल्या, परंतु नागरिकांच्या या मूलभूत प्रश्नावर प्रत्यक्ष काम झाले नाही. आमदार खताळ यांनी पदभार स्वीकारल्यापासून या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला. अवघ्या एका वर्षात त्यांनी या कामासाठी १० लाखांहून अधिक निधी मंजूर करून आणला आणि कामही सुरू केले. दैनंदिन जीवनाशी निगडित वीज जोडणीचा प्रश्न सुटल्यामुळे डोळासणे परिसरातील नागरिकांच्या वतीने मी आमदार खताळ यांचे आभार मानत असल्याचे राहुल मुके यांनी म्हटले आहे.