देशातील प्रमुख शिक्षणसंस्थांचे प्रणेते, माजी राज्यपाल आणि ‘पद्मश्री’ पुरस्कारविजेते ज्ञानदेव यशवंतराव पाटील अर्थात डॉ. डी. वाय. पाटील यांचे वयाच्या ९० व्या वर्षी कोल्हापूर येथे निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे ढासळली होती. त्यांच्या निधनाने शिक्षण, समाजकारण आणि राजकारण या सर्वच क्षेत्रांत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
डॉ. डी. वाय. पाटील यांनी महाराष्ट्र आणि देशभरात अनेक दर्जेदार शैक्षणिक संस्थांची स्थापना करून लाखो विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची द्वारे खुली करून दिली. राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ या प्रतिष्ठेच्या नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते.
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राहिलेले डी. वाय. पाटील यांनी १९५७ ते १९६२ या काळात कोल्हापूर शहराचे महापौर म्हणून यशस्वी जबाबदारी सांभाळली. त्यानंतर १९६७ आणि १९७२ मध्ये ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते. संस्था उभारणीतूनच सुजाण नागरिक घडतात आणि समाजाची खऱ्या अर्थाने प्रगती होते, या विचाराने त्यांनी राज्यात शैक्षणिक संस्थांचे विशाल जाळे विणले.
त्यांनी १९८३ मध्ये नवी मुंबई येथे ‘रामराव आदिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ या त्यांच्या पहिल्या इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना केली. आज त्यांच्या ‘डी. वाय. पाटील ग्रुप’अंतर्गत ७ पेक्षा जास्त अभिमत व खाजगी विद्यापीठे आणि १५० हून अधिक शैक्षणिक संस्था अविरतपणे कार्यरत आहेत. त्यांच्या जाण्याने शिक्षण क्षेत्राची अतोनात हानी झाली असून सर्वच स्तरांतून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
दरम्यान राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील पाटील यांना श्रद्धांजली व्यक्त करताना म्हटले आहे की, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. शिक्षणाच्या माध्यमातून बहुजन समाजातील लाखो विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची दारे खुली करणारे दूरदृष्टीचे शिक्षणमहर्षी म्हणून त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.
‘डी. वाय. दादा’ या नावाने महाराष्ट्रभर परिचित असलेल्या दादांनी अत्यंत तरुण वयात महाराष्ट्र विधानसभेत जनतेचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण क्षेत्राच्या उभारणीसाठी समर्पित केले. पुणे, मुंबई, कोल्हापूरसह राज्यातील विविध भागांत त्यांनी उभारलेल्या शैक्षणिक संस्थांमधून आज लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. उत्कृष्ट प्रशासकीय कौशल्य, आधुनिक शिक्षणाचा ध्यास आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची बांधिलकी ही त्यांच्या कार्याची ओळख होती.
त्यांचे चिरंजीव, माजी मंत्री आणि काँग्रेस विधान परिषदेचे गटनेते सतेज (बंटी) पाटील तसेच संपूर्ण पाटील कुटुंब आज राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांचा वारसा समर्थपणे पुढे नेत आहे.
या दुःखद प्रसंगी मी पाटील कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. परमेश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो आणि पाटील कुटुंबियांना हे अपरिमित दुःख सहन करण्याचे बळ प्रदान करो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली.