महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन –
राज्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने पिके जळून खाक झाली असून शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. त्यामुळे सरकारने पंचनाम्यांचा फार्स न करता राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरघोस मदत करावी, अशी जोरदार मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
वडगाव पान येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारात आयोजित शेतकरी मेळावा, वार्षिक सर्वसाधारण सभा आणि विविध विकासकामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. सभापती शंकर पाटील खेमनर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माधवराव कानवडे, डॉ. जयश्रीताई थोरात, बाबासाहेब ओहोळ, उपसभापती गीताराम गायकवाड आणि सचिव सतीश गुंजाळ यांच्यासह संस्थेचे सर्व संचालक व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शेतकरी सुविधा केंद्र, अंतर्गत डांबरी रस्ते तसेच लिलाव शेड क्रमांक १ व २ चे लोकार्पण करण्यात आले.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यातील सर्वोत्तम बाजार समिती आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या सोयीसाठी बाजार समितीची संकल्पना सुरू केली आणि ती देशभर गेली. बाजार समिती मोडीत काढण्यासाठी केंद्र सरकारने तीन काळे कायदे काढले होते. या विरोधात हरियाणा व पंजाबमधील शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन छेडले त्यात ७०० शेतकऱ्यांना बलिदान द्यावे लागले.
महसूल मंत्री असताना वडगाव पान उपबाजारासाठी १६ एकर जागा उपलब्ध करून दिल्यामुळे आज येथे कांदा व भाजीपाल्याचे मोठे मार्केट उभे राहिले आहे. आगामी काळात आंबी खालसा येथे १५ एकर जागेवर नवीन अद्यावत उपबाजार सुरू होणार असल्याचेही सांगितले. शेतमालाला योग्य भाव आणि उत्कृष्ट सुविधा देणाऱ्या या बाजार समितीने शेतकरी, व्यापारी व ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. निळवंडे धरण व कालव्यांचे काम पूर्ण करून तालुक्याला पाण्याचा हक्क मिळवून दिला; मात्र सध्या सुरू असलेल्या विजेच्या खेळाविरोधात आणि तालुक्याचे पाणी वाचवण्यासाठी सर्वांना सतर्क राहावे लागेल, असे सांगून त्यांनी २२ तारखेच्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.
नाशिक-पुणे रेल्वेबाबत लोकप्रतिनिधींची बालिश वक्तव्ये अत्यंत दुर्दैवी
तालुक्याच्या विकासासाठी नाशिक-पुणे थेट रेल्वे मार्ग अत्यंत महत्त्वाचा होता. या मार्गासाठी जमिनी अधिग्रहित करून शेतकऱ्यांना मोबदलाही मिळाला होता. या रेल्वेमुळे स्थानिक युवक आणि शेतमाल देशभरात पोहचण्यास मदत झाली असती. परंतु राजकीय स्वार्थापोटी या मार्गात अडथळे आणून तो बदलण्यात आला. संगमनेरचे नवीन लोकप्रतिनिधी यावर मूलभूत भूमिका न घेता ‘ती काय नेहरू गार्डनची रेल्वे आहे का’ अशी बालिश वक्तव्ये करत आहेत, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. तालुक्याचे वैभव टिकवण्यासाठी सर्वांना संघर्ष करावा लागेल, असा इशाराही थोरात यांनी दिला.
यावेळी बोलताना डॉ. जयश्रीताई थोरात यांनी सरकारकडे शक्तीपीठ महामार्गासाठी पैसे आहेत, पण संकटग्रस्त शेतकऱ्यांना देण्यासाठी निधी नाही अशी खरमरीत टीका केली. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी तालुक्याला मिळालेले वैभव पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती शंकर पाटील खेमनर यांनी केले, नोटीस वाचन सचिव सतीश गुंजाळ यांनी केले, सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी तर आभार उपसभापती गीताराम गायकवाड यांनी मानले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Share.
Leave A Reply