महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर : आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवकांना आत्महत्या करू नका अशी कळकळीची विनंती करून देखील राज्यात आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले आत्महत्येचे लोन आता संगमनेरपर्यंत येऊन धडकले आहे. आंदोलकांना भेटण्यासाठी आलेल्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना “विखे पाटील परत जा, परत जा” या आंदोलकांच्या निदर्शनाचा सामना करावा लागल्यानंतर आता संगमनेरमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रकार समोर आला आहे.
संगमनेर तालुक्यातील झोळे गावामध्ये सागर भाऊसाहेब वाळे (वय 25 वर्ष) या तरुणाने गळफास घेऊन मंगळवारी (31 सप्टेंबर) पहाटे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सागर वाळे याने घराच्या मागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये आत्महत्या केली. याच शेडमध्ये आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने एका वहीमध्ये लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना मिळाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर वाळे या तरुणाने सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे कुटुंबासमवेत जेवण केल्यानंतर सर्वजण झोपले होते. मंगळवारी सागर हा घराच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सागर याने आत्महत्या करण्यापूर्वी एका वहीमध्ये लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे की,”आम्ही जातो आमच्या गावा, एक मराठा लाख मराठा, आम्हाला आरक्षण नसल्यामुळे मी फाशी घेत आहे. कोणाला जबाबदार धरू नये. एक मराठा लाख मराठा. आपला लाडका सागर मराठा.” असा उल्लेख त्याने या चिठ्ठीमध्ये केला आहे.
मराठा आरक्षणाचा विषय राज्यकर्त्यांच्या वेळ काढूपणामुळे दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. आरक्षणासंदर्भातील आंदोलनाला एकीकडे हिंसक वळण लागत असतानाच आता दुसरीकडे राज्यात आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्यांचे सत्र देखील सुरू झाले आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने विविध पातळ्यांवर जोर धरला आहे. आंदोलनामध्ये शासकीय मालमत्तांचे नुकसान होऊ लागल्याने बीड, धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.



