येथील बोल्हेगाव फाटा परिसरातील स्वामी समर्थ केंद्रात ( दिंडोरी प्रणित) रविवारी ( ता. २६ जुलै) सकाळी ८ ते ११ या वेळेत स्वामी चरित्र या ग्रंथाचे तब्बल २७ हजार पारायण पार पडले. राज्याच्या अध्यात्मिक क्षेत्रातील एकाच दिवसाच्या पारायणाचा हा उच्चांक मानला जातो.
केंद्राचे प्रमुख चंद्रशेखर (काका) लोळगे यांच्या नेतृत्वाखालील टीमने हा अभिनव उपक्रम यशस्वी केला. आज सकाळी सात वाजल्यापासूनच केंद्राकडे येणारे सर्व रस्ते गर्दीने फुलून गेले होते. पारायणासाठी आलेल्या भाविकांसाठी भव्यदिव्य मंडपात प्रशस्त बैठक व मोठी पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती.
सकाळी आठ वाजता एका सेवेकरी जोडप्याच्या हस्ते स्वामी समर्थांची आरती होवून पारायण सोहळ्याला सुरुवात झाली. तीन टप्प्यांमध्ये प्रत्येकी नऊ हजार याप्रमाणे एकंदर २७ हजार पारायण निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात आले. या केंद्राला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने २५ हजार पारायण पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला होता. तथापि, प्रत्यक्षात मात्र हा आकडा २७ हजारांपर्यंत गेला.
पारायण सोहळ्यात सहभागी झालेल्यांमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक होती. वृद्धांचा उत्साहही वाखाणण्याजोगा होता. शाळकरी मुलेही हिरिरीने सहभागी झाली होती. विशेष म्हणजे तरुण-तरुणींचा पारायण करण्यात तसेच आयोजनाच्या कामातही लक्षणीय सहभाग होता. पारायण सोहळा संपन्न झाल्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
स्थानिक नगरसेवकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पारायण सोहळ्याला भेट देवून या आयोजनाबद्दल लोळगे व त्यांच्या सेवेकरी चमुचे कौतुक केले. या पारायण सोहळ्याच्या धर्तीवरच पुढील काळात दुर्गा सप्तशती या ग्रंथाच्या १००८ पारायण सोहळ्याचे आयोजन करणार असल्याचा घोषणा लोळगे यांनी यावेळी केली.