शुक्रवार, दि. ३ मे
सोने व्यापाऱ्याकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी मुंबईतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू असलेले अविनाश जाधव, वैभव ठक्कर यांच्या विरोधात लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मरीन ड्राईव्ह येथील रहिवासी असलेल्या शैलेश कांतीलाल जैन यांनी यासंदर्भात पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रार दाखल केली आहे. जैन हे सोन्याचा व्यवसाय करतात. जैन त्यांच्या ज्वेलरी शॉप मध्ये वैभव ठक्कर यांच्यासोबत व्यवहार करत असताना अविनाश जाधव, त्यांचा चालक आणि इतर पाच-सहा जण सुरक्षा रक्षकासह बळजबरीने ज्वेलरी शॉप मध्ये आले.
तेथे जैन यांचा मुलगा सौमील याला मारहाण केली. तसेच पाच कोटी रुपये दिले नाही तर मुलाला उचलून घेऊन जाण्याची व नुकसान करण्याची धमकी दिली. जैन यांच्या ऑफिस मधील सीसीटीव्ही मध्ये यासंबंधीचे सर्व चित्रण झाले असल्याचे त्यांनी म्हटले असून पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे.
दरम्यान पोलिसांनी आयपीसीच्या कलम ३८५ (खंडणी वसूल करण्यासाठी एखाद्याला धमकी देणे), कलम १४३ (बेकायदेशीर कृत्य), कलम १४७ (दंगल घडवण्याचा प्रयत्न करणे), कलम ३२३ (स्वेच्छेने इजा पोहोचवणे) आणि कलम १२०-बी (कट रचणे) इत्यादी कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याची माहिती समजते.
जाधव यांच्याकडून आरोपाचे खंडन…
एका वैभव नावाच्या व्यक्तीने मला कॉल करून मला व माझ्या पत्नीला धावून ठेवले असल्याचे सांगितले होते. मी त्याला पोलीस नियंत्रण कक्षात फोन करण्यास सांगितले. त्यानंतर मी मदतीसाठी पोलिसांसह तेथे गेलो असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. तसेच दाखल झालेल्या गुन्ह्या संदर्भात कल्पना नसल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.


