बुधवार, दि. ८ मे
पती-पत्नीच्या वादाचा अंत अखेर पत्नीने दोन्ही मुलींचा गळफास देत खून करत स्वतः इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्यात झाला. पत्नीने स्वतः चिमुकलीचा आत्महत्या पूर्व व्हिडिओ नातलगांना पाठवत आत्महत्या केल्याची ही दुर्दैवी घटना नाशिकमध्ये घडली आहे.
अश्विनी स्वप्निल निकुंभ (वय ३०), आराध्या स्वप्निल निकुंभ (वय ८) आणि अगस्त्या स्वप्निल निकुंभ (वय २) अशी मृत मायलेकींची नावे आहेत. बुधवारी सकाळी सात वाजता आडगाव मधील जत्रा हॉटेल जवळील इच्छामणी नगरमध्ये असलेल्या हरीवंदन सोसायटीत ही दुर्दैवी घटना घडली.
मृत अश्विनी हिने आत्महत्येपूर्वी पती स्वप्निल निकुंभ देत असलेल्या त्रासाच्या माहितीचा आराध्या आणि स्वत:चा व्हिडीओ नातलगांना पाठविला. तसेच पती स्वप्निल आणि त्याचा भाऊ तेजस ऊर्फ शंभू, नणंद मयूरी ऊर्फ ताऊ सूर्यवंशी हे आमच्या आत्महत्येस जबाबदार आहेत, अशी सुसाईड नोट लिहून व्हायरल केली.
मिळालेल्या माहितीनुसार अश्विनीचा सन २०१४ मध्ये स्वप्निल निकुंभ याच्याशी प्रेमविवाह झाला होता. स्वप्निल व अश्विनीमध्ये दोघांचा भूतकाळ, त्यातील प्रेमसंबंध यातून वाद सुरु होते. हे वाद उदभवण्यास नणंद मयूरी ऊर्फ ताऊ जबाबदार असल्याचे अश्विनीने सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.
मंगळवारी रात्री अश्विनीने आपल्या मुलींना जेवणात विष दिले. त्यानंतर दोघींना मध्यरात्री गळफास देऊन पहाटे ६.५५ वाजता हरिवंदन सोसायटीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी घेतली. या घटनेत तिचा मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच आडगाव पोलीस व अश्विनीचे नातलग घटनास्थळी दाखल झाले. गंभीर अवस्थेत तिघींना आडगाव वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी करत तिघींना मृत घोषित केले.


