गुरुवार, दि. २३ मे
अकोले तालुक्यातील सुगावमध्ये पाण्यात बुडालेल्या तरुणांच्या शोधासाठी धुळ्याहून बोलवण्यात आलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (SDRF) पथकाची बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत तीन जवानांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. शहीद झालेल्या या तिन्ही जवानांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासकीय इतमामात मानवंदना दिली. तसेच शहीद जवानांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

पीएसआय प्रकाश नाना शिंदे, कॉन्स्टेबल राहुल गोपीचंद पावरा आणि चालक वैभव सुनील वाघ अशी अशी बचाव कार्यावेळी पाण्यात बुडून शहीद झालेल्या व पंकज पंढरीनाथ पवार, अशोक हिम्मतराव पवार असे बचावलेल्या एसडीआरएफच्या जवानांची नावे आहे.
संगमनेरचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्यासह पोलीस आणि महसूलचे अधिकारी कर्मचारी मदत कार्यात रात्रीपासूनच उपस्थित होते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच गुरुवारी सकाळीच राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, स्थानिक अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी घटनास्थळी भेट दिली होती.

पाठोपाठ राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर, जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासह महसुल व प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. दुपारी राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील घटनास्थळी आले.

मंत्री विखे यांच्यासह अधिकाऱ्यांच्या हस्ते शहीद जवानांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी पोलीस दलाने शासकीय इतमामात या शहिदांना मानवंदना दिली. ज्यावेळी शोकाकुल झालेल्या जवानांच्या नातेवाईक आणि सहकाऱ्यांना आपल्या भावना आवरणे कठीण जात होते. मंत्री विखे यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांचे सांत्वन केले.
प्रवरेच्या पाण्यात बुडालेल्या अन्य दोन व्यक्तींचा शोध घेण्याचे मदत कार्य अद्यापही सुरूच होते. दरम्यान यावेळी विखे यांनी सोडण्यात आलेल्या पाण्याचा प्रवाह बंद करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. याच कारणासाठी सुरू असलेल्या आंदोलकांची देखील त्यांनी यावेळी भेट घेतली.

