
मंगळवार, ३० जुलै
खासदार निलेश लंके यांच्या उपोषणानंतर अहमदनगर जिल्ह्यात नगरच्या पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेचा भ्रष्टाचार समोर आला असतानाच आता एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे देखील हप्तेखोरी समोर आली असून या भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी केली आहे.
एस टी महामंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी हप्ते घेऊन संगमनेर तालुक्यात व नगर जिल्ह्यात हॉटेल, ढाब्यांवर एसटी बसेससाठी अनधिकृत थांबे तयार केले आहेत. या माध्यमातून अधिकारी, कर्मचारी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करत आहे. हप्ते घेऊन बेकायदेशीररित्या सुरू असलेले अनधिकृत थांबे त्वरित बंद करून अधिकारी, कर्मचारी, बस चालकांवर कारवाई करण्याची मागणी कतारी यांनी केली आहे.
संगमनेर तालुक्यात एसटी महामंडळाने कोणत्याही हॉटेल, ढाबा, रेस्टॉरंटवर अधिकृत बस थांबा केलेला नाही. तालुक्यातील अनधिकृत बस थांब्यासाठी प्रत्येक एसटी बस मागे दीड हजार रुपये हप्त्याची आकारणी अधिकारी, कर्मचारी करत आहे. संगमनेर येथील संगमनेर नगर मार्गावरील मांची व कोकणगाव येथील हॉटेल पुरोहित या ठिकाणी असाच अनधिकृत पद्धतीने एसटीला थांबा देण्यात आला आहे. यासंदर्भात कतारी यांनी एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे मोबाईलवर व लेखी तक्रार केली होती, मात्र या तक्रारीची कोणतीही दखल घेतली गेली नसल्याचे म्हटले आहे.
हॉटेल, ढाबा, रेस्टॉरंटला एसटी करिता अधिकृत थांबा देताना महामंडळ संबंधित मालकाकडून लाखो रुपयांचे डिपॉझिट आकारते. अनेक अटी, शर्तीचे पालन करावे लागते. एका बससाठी साधारणतः 200 ते 400 रुपयांपर्यंत अधिकृतपणे पैशाची आकारणी केली जाते. पाण्याच्या बाटल्या देखील महामंडळाकडूनच अधिकृतपणे विकत घ्याव्या लागतात. ठरलेल्या किमतीपेक्षा जास्त किमतीत चहा, नाश्ता, जेवण विकता येत नाही. हॉटेल परिसराच्या आसपास किंवा हॉटेलमध्ये दारू विक्री करता येत नाही. ज्या ठिकाणी बस थांबा आहे त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे तसेच स्वच्छतागृह व स्वच्छतेबाबत विविध अटी शर्ती असतात. याशिवाय अधिकारी कधीही येतात दादागिरी करून फुकटचे जेवण करून जातात.
एसटी बस चालक देखील प्रत्येक थांब्यावर पोटभर फुकटचे जेवण करतात व संध्याकाळसाठी देखील पार्सल घेऊन जातात. कोल्ड्रिंक्स पाण्याच्या बाटल्या देखील त्यांना मोफत द्याव्या लागतात. प्रत्येक फेरीसाठी शंभर ते दोनशे रुपयांची बस चालक मागणी करतात. या सर्व गोष्टींमुळे हॉटेल, ढाबा, रेस्टॉरंट वाल्यांना अधिकृत बस थांबा चालविणे परवडत नाही. या उलट अनधिकृत थांब्यावर एका बस मागे दीड हजार रुपयांच्या हप्त्याचे आकारणी करतात. अनधिकृत थांब्याच्या ठिकाणी कोणत्याच अटी शर्तीची पूर्तता केली जात नाही. केवळ अधिकारी कर्मचाऱ्यांचा खिसा गरम करण्याचे काम होत असते.
या सर्व प्रकारामागे एसटी महामंडळाला लाखो रुपयांचा चुना लागत असून अनधिकृत बस थांबल्यावर कोणत्याही प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे नाही. तसेच अन्नाची पातळी, स्वच्छता ग्रह इतर कोणत्याही अटी शर्ती पाळल्या जात नसताना देखील केवळ दीड हजार रुपयांसाठी प्रवाशांच्या जीवाशी बस चालक व संबंधित कर्मचारी खेळत आहे. हा प्रकार त्वरित थांबला नाही तर राज्याच्या परिवहन मंत्र्यांच्या दालनासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील अमर कतारी यांनी दिला आहे.


