सोमवार, १९ ऑगस्ट
मानधन वाढीसह अन्य मागण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संघर्ष करणाऱ्या राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा बुधवारी (२१ ऑगस्ट) मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्ष ॲड. निशाताई शिवूरकर यांनी दिली.
राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संघर्ष करीत आहे. १५ जुलैपासून कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शासकीय मिटींग, अहवाल देणे इत्यादी कामांवर बहिष्कार टाकला आहे. १२ ऑगस्टपासून मुंबईच्या आझाद मैदानावर कृती समितीच्यावतीने धरणे आंदोलन सुरू आहे.
एकीकडे राज्य सरकार लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. तर दुसरीकडे मात्र अंगणवाडी कर्मचारी बहिणींच्या प्रश्नाकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहे. महाराष्ट्र शासनाबरोबर झालेल्या अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या बैठकांमध्ये महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचा प्रस्ताव शासनाला देण्याचे मान्य केले आहे.
कमी मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शासनाची लाडकी बहीण योजना यशस्वी व्हावी म्हणून प्रचंड कष्ट घेतले आहे. या कष्टाची जाणीव शासनाला नाही. मंत्री तटकरे केवळ तोंडदेखले कौतुक करत आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. अशा परिस्थितीत अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने बुधवारी (२१ ऑगस्ट) मुंबईच्या आझाद मैदानावर एकत्रित होत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
या कारणासाठी मोर्चा… सहभागी होण्याचे आवाहन…
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी द्यावी असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे मात्र राज्य सरकार कबूल करूनही ग्रॅच्युईटी देण्याचे टाळत आहे. कर्मचाऱ्यांमध्ये सरकार विरोधात असंतोष असल्याने मानधन वाढ मिळावी, दरमहा पेन्शन मिळावी, ग्रॅच्युईटी मिळावी, लाभार्थ्यांना मिळणाऱ्या आहाराच्या रकमेत वाढ व्हावी, इत्यादी मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
नगर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांसह राज्यभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन संघटनेच्या राज्य अध्यक्ष ॲड. निशाताई शिवूरकर, जिल्हाध्यक्ष सत्यभामा तिटमे, सरचिटणीस शांताराम गोसावी, भारती घरत, बेबी हरनामे, पूजा घाटकर, सुनंदा राहणे, शोभा नागरे, सुनंदा कदम आदींनी केले आहे.


