शनिवार, दि. ३१ऑगस्ट
पालघर : १३ दिवस झाले तरी गावाकडील आई वडील आणि बहिणीची संपर्क झाला नाही. त्यामुळे मनात हजारो शंका निर्माण होत चलबिचल सुरू झाली आणि त्याने गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. गावाकडील घरी जाऊन दरवाजा उघडून बघतो तर काय, घरात पसरलेल्या प्रचंड दुर्गंधीत त्याला आई-वडिल आणि बहिणीचे मृतदेह कुजलेल्या स्थितीत दिसून आले. समोरच दृश्य बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती.
राज्यात दररोज येथे धक्कादायक घटना समोर येत असतानाच या घटनेत आणखी एका घटनेची भर पडली आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील नेहरोली गावात एकाच कुटुंबातील तीन जणांचे मृतदेह आढळून आले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. पालघरच्या वाडा पोलिसांनी तीनही मृतदेह तपासणीसाठी ताब्यात घेत जे. जे. रुग्णालयात पाठवले आहे. वाडा पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहे.
नेमकं काय घडलं…
वाडा तालुक्यातील नेहरोली ग्रामपंचायत हद्दीत बोन्द्रे आळीत गेल्या पंचवीस वर्षांपासून गुजरातचे राठोड कुटुंब राहात होते. त्यांचा मोठा मुलगा सुहास हा गुजरात येथे तर लहान मुलगा पंकज विरारला राहत आहे. १३ दिवसांपासून घरच्यांसोबत संपर्क होत नसल्याने मनात नाना शंका कुशंका निर्माण झालेल्या अवस्थेत सुहासने गुजरातहून गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. गावी पोहोचलेल्या सुहासने घराचे आतून बंद असलेले दार ठोठावले. मात्र प्रतिसाद नाही मिळाल्याने त्याने दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.
घरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती. नेमकं काय झालं समजत नव्हतं, त्याने घरात शोधाशोध सुरू केली तर समोरचा दृश्य बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आई आणि बहिणीचा मृतदेह त्याला कुजलेल्या स्थितीत कपड्यात झाकून ठेवलेला दिसून आला. वडिलांचा मृतदेह बाथरूममध्ये होता.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच वाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे.



