मंगळवार, १६ ऑक्टोबर
संगमनेर – सन २०२४-२५ या गळीप हंगामात श्री गजानन महाराज शुगर लिमिटेड साखर कारखान्याने साडेपाच लाख मॅट्रिक टन ऊस गाळप आणि चांगला साखर उतारा मिळविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बिरोले यांनी दिली.
विजयादशमीच्या दिवशी बिरोले यांच्या हस्ते पठाण भागाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेल्या कवठे मलकापूर येथील श्री गजानन महाराज शुगर लिमिटेड या साखर कारखान्याच्या मिल व बॉयलिंग हाऊसमधील मशिनरीचे विधिवत पूजन करत गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब वर्पे, संचालक हरिभाऊ गीते, जनरल मॅनेजर अण्णासाहेब शेंडे, चीफ इंजिनियर रोहिदास रसाळ, प्रशासन व्यवस्थापक भाऊसाहेब मंडलिक, इंजिनीयर केशव वर्पे, संतोष नान्नर, शिवाजी नरवडे, वैभव सागर, सिद्धांत घोलप, सचिन नेहे, गोरख हजारे यांच्यासह कामगार, शेतकरी, सभासद आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बिरोले म्हणाले, मागील हंगामातील कमतरता लक्षात घेत कारखान्याने चालू गळीत हंगामाकरिता अचूक नियोजन केले असून गाळपाचे उद्दिष्ट समोर ठेवत हंगाम यशस्वीरीत्या पूर्ण करण्याचे व्यवस्थापनाने ठरविले आहे. कारखान्याला ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांच्या ऊसाला शाश्वत भाव देण्याचे तसेच वेळेत ऊसतोड करून गळीत यशस्वी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
विजयादशमीच्या शुभेच्छा देताना गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी कामगार, वाहतूक ठेकेदार, ऊस पुरवठादार शेतकरी व कामगार यांनी सहकार्य करण्याचे आवाहन बिरोले यांनी केले.



