सोमवार, १८ नोव्हेंबर
संगमनेर – साखर धंदा मोठ्या अडचणीतून वाटचाल करत आहे. कारखाना कार्यक्षेत्राबाहेरून ऊस आणून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शाश्वत भाव देण्याचा प्रयत्न करेल, अशी ग्वाही कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बिरोले यांनी दिली आहे.
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील कौठे मलकापूर येथील ओसाड माळरानावर उभ्या राहिलेल्या श्री गजानन महाराज शुगर लिमिटेड या कारखान्याच्या आठव्या गळीप हंगामाचा शुभारंभ व बॉयलर अग्नि प्रदीपन समारंभ कारखान्याचे अध्यक्ष रवींद्र बिरोले यांच्या पत्नी अश्विनी व मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी विधीवत व शास्त्रोक्त पद्धतीच्या वैदिक मंत्रोपचारात पार पडला. यावेळी बिरोले बोलत होते.
बिरोले म्हणाले, कारखान्याच्या मशिनरीच्या देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण झाली असून या गळीप हंगामात दैनंदिन साडेतीन हजार मेट्रिक टनाने गाळप पूर्ण करण्याचे उद्दिष्ट कारखान्याने समोर ठेवले आहे. कार्यक्षेत्राबरोबरच यावर्षी कारखाना शेजारच्या पारनेर, राहुरी, श्रीरामपूर, नेवासे, गंगापूर, वैजापूर आधी ठिकाणाहून ऊस आणून गाळप करणार आहे.
या हंगामात कारखाना शाश्वत ऊस भावासोबतच ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, तोडणी कामगार, वाहतूकदार या सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे उसाच्या टनेजमध्ये वाढ होऊन सुरळीतपणे कारखाना चालविण्याचा व्यवस्थापन कसोशीने प्रयत्न करेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली.
यावेळी अण्णासाहेब वर्पे, तानाजी बागुल, गुलाबराजे भोसले, नवनाथ ढेंबरे, आप्पासाहेब गुरसळ, आप्पासाहेब टेकुडे, नवनाथ खेमनर, योगेश खेमनर, सोपान वाळुंज, माधव थिटमे, जनरल मॅनेजर अप्पासाहेब शेंडे, चीफ इंजिनियर विजयकुमार खरात, प्रशासन व्यवस्थापक भाऊसाहेब मंडलिक, सिव्हिल इंजिनियर गोरक्षनाथ उबाळे, चीफ इंजिनिअर रोहिदास रसाळ, केशव वर्पे, शिवाजी नरवडे, वैभव सागर आदीसह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

