छत्रपती संभाजीनगर –
माजी न्यायमूर्ती, ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांचं आज शनिवारी (२५ जानेवारी) निधन झालं. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दीर्घ आजारामुळे त्यांच्यावर छत्रपती संभाजी नगर मधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे माजी न्यायमूर्ती होते. तसेच न्यायालयीन सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी मराठी साहित्य क्षेत्रात मोठी भूमिका बजावली. वर्धा येथे झालेल्या ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. साहित्य क्षेत्रात न्यायाच्या गोष्टी, संघर्ष आणि शहाणपण, तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ, कायदा आणि माणूस, समाज आणि संस्कृती, सावलीचा शोध आदी पुस्तके प्रसिद्ध आहे.
चपळगावकर यांनी १९६२ ते १९७८ या काळात बीडमध्ये वकिली केली होती. त्यानंतर त्यांनी १९७९ ते १९८१ दरम्यान त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली होती. १९८१ पासून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश म्हणून काम केले. मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणूनही त्यांची १९९० मध्ये नियुक्ती झाली होती. त्यानंतर १० एप्रिल १९९९ मध्ये ते निवृत्त झाले.
चपळगावकर यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले असून त्यामध्ये महाराष्ट्र फाउंडेशनचा दिलीप चित्रे स्मृती साहित्य जीवन गौरव पुरस्कार मिळाला. ‘तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ, या पुस्तकासाठी त्यांना भैरूरतन दमानी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. चपळगावकर यांना प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले.



