दि. २६ जानेवारी-
तीर्थक्षेत्र माहूर शहरात असलेल्या ठाकूर बुवा यात्रेसाठी आलेल्या दिंडीतील भाविकांनी शनिवारी रात्री (२५ जानेवारी) भगर आणि शेंगदाण्याची आमटी खाल्ल्यानंतर मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास या भाविकांना मळमळ उलट्या झाल्याने विषबाधेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात रविवारी पहाटे ही घटना घडली असून विषबाधा झालेल्या सर्व रुग्णांना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांपैकी चौघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती असून या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
तीर्थक्षेत्र माहूर शहरात दरवर्षी षट्तिला एकादशीला ठाकूर बुवा यांची यात्रा भरते. यात्रेसाठी राज्यभरातून अनेक ठिकाणच्या पायी दिंड्या माहूरमध्ये येत असतात. दिंड्यांसाठी मोकळ्या जागेत, विविध मठात आणि शहरातील मंदिराच्या परिसरात तात्पुरत्या राहत्या उभ्या केल्या जात असतात. शुक्रवारी (२४ जानेवारीला) हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक येथील दिंडी देव देवेश्वर परिसरात दाखल झाली होती.
दिंडीतील भाविकांनी शनिवारी (२५ जानेवारी) दिवसभर देवदर्शन घेतल्यानंतर रात्री भगर आणि शेंगदाण्याची आमटी खाल्ली होती. त्यानंतर मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास यातील काही जणांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यानंतर अनेकांना असाच त्रास झाल्याने त्यांना तातडीने माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
सकाळपर्यंत रुग्णांची संख्या वाढत वाढत ५० वर गेली होती. विषबाधेच्या या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली असून माहूर ग्रामीण रुग्णालयातील भाविकांवर उपचार सुरू असून तहसीलदार किशोर यादव यांनी तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना येथे बोलावत रुग्णांवर उपचार केले. दरम्यान उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची प्रकृती चांगली असून सायंकाळपर्यंत त्यांना उपचारानंतर सोडले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.


