महाराष्ट्र संवाद न्यूज –
लाचेची रक्कम स्वीकारताना संशय आल्याने शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापकाने फिल्मी स्टाईलमध्ये पलायन केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (दि. २४) बागलाण तालुक्यातील ततानी येथे घडली. जितेंद्र खंडेराव सोनवणे (वय ४५) असे फरार मुख्याध्यापकाचे नाव आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सापळा रचला असताना सोनवणे यांनी कार्यालयातील टेबलावर लाचेची रक्कम ठेवून मागच्या दरवाजाने धूम ठोकल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ३३ वर्षीय असून ते आश्रमशाळेत रोजंदारी शिक्षक आहेत. त्यांची स्वतःची पिठाची गिरणी आहे. त्यांना ततानी शासकीय आश्रमशाळेतील धान्य दळणाचे कंत्राट मिळाले आहे. तक्रारदारांनी केलेल्या कामाचे ८७ हजार ४८० रुपयांचे बिल तयार झाले होते.
हे बिल त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याच्या मोबदल्यात मुख्याध्यापक जितेंद्र सोनवणे यांनी तक्रारदाराकडे आठ हजार रुपयांची लाच मागितली होती. यासोबतच, मार्च आणि एप्रिल २०२५ या महिन्याचे बिल मंजूर करण्यासाठी आणखी १३०० रुपये देण्याची मागणी त्यांनी केली होती.
लाचेची मागणी आणि मुख्याध्यापकाचा भ्रष्ट व्यवहार पाहून तक्रारदाराने थेट नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गाठले आणि घडलेला प्रकार सांगितला. तक्रारदाराच्या माहितीची खातरजमा केल्यानंतर एसीबीच्या पथकाने ततानी आश्रमशाळेत सापळा रचण्याची तयारी केली.
गुरुवारी एसीबीचे पथक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापक कार्यालयाजवळ दबा धरून बसले होते. ठरल्यानुसार तक्रारदाराने मुख्याध्यापक सोनवणे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना आठ हजार रुपयांची लाचेची रक्कम दिली. सोनवणे हे ती रक्कम टेबलावर ठेवून मोजत असतानाच त्यांना काहीतरी संशय आला. क्षणाचाही विलंब न करता सोनवणे यांनी तत्काळ टेबलावरील लाचेची रक्कम तिथेच ठेवली आणि कार्यालयाच्या मागच्या बाजूच्या दुसऱ्या गेटने धूम ठोकली.

अचानक झालेल्या या प्रकारामुळे एसीबीचे अधिकारीही क्षणभर गोंधळले. मात्र, त्यांनी तात्काळ मुख्याध्यापकाचा पाठलाग सुरू केला, परंतु तोपर्यंत सोनवणे फरार होण्यात यशस्वी झाला होता. या घटनेनंतर एसीबीच्या पथकाने मुख्याध्यापक सोनवणे यांच्या विरोधात सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फरार मुख्याध्यापकाचा शोध घेण्यासाठी आता पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. या घटनेमुळे आश्रमशाळेतील इतर कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एसीबीचे अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, फरार मुख्याध्यापकाला लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे. या घटनेमुळे शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


