महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर
“काँग्रेसने नेहमीच सर्वधर्मसमभावाचा विचार जपला आहे. जातीनिहाय जनगणना व्हावी, ही काँग्रेसची जुनी मागणी आहे. जातीनिहाय जनगणनेमुळे दुर्लक्षित आणि वंचित घटकांना आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. हा निर्णय काँग्रेसच्या सततच्या पाठपुराव्याचे यश आहे,” युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी म्हटले आहे.

जातीनिहाय जनगणना या निर्णयाचे संगमनेरमध्ये युवक काँग्रेसने जोरदार स्वागत केले. यशोधन कार्यालयाच्या मैदानावर युवक काँग्रेस अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसने जातीनिहाय जनगणनेचा जल्लोष केला. यावेळी निखिल पापडेजा, डॉ. विजय पवार, शरद पावबाके, प्रीतम साबळे, रमेश गफले, शुभम शिंदे, रमेश नेहे, वैष्णव मुर्तडक, शुभम काळे यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
जातीनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे फटाके फोडून आणि ‘राहुल गांधी जिंदाबाद’, ‘काँग्रेस पक्षाचा विजय असो’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत स्वागत करण्यात आले.


देशात जातीनिहाय जनगणना व्हावी ही काँग्रेस पक्षाची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक राज्यांमध्ये आंदोलने होत आहेत. देशातील प्रत्येक जातीची लोकसंख्या सरकारला माहीत असणे आवश्यक आहे, ज्यामुळे त्यांना योग्य वाटा मिळू शकेल आणि देशात बंधुभावाचे वातावरण निर्माण होईल. केंद्र सरकारने नुकताच जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे, हे काँग्रेसचे मोठे यश आहे. – माजी मंत्री बाळासाहेब थोरात.



