माझ्यावरील हल्ला संघाकडूनच, प्रधानाच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही: अभिजित दिपके यांचा गंभीर आरोप
"महाराष्ट्रात दोन मोठे पक्ष फोडले गेले. बंगालमध्ये पक्ष फोडला, मतदान 'डिलीट' केले जात आहे. जिथे मतदान डिलीट होते, तिथे एका विशिष्ट पक्षाला फायदा होतो. भगतसिंग, राजगुरु यांनी आंदोलन केले असते, तर आज त्यांनाही देशद्रोही ठरवले गेले असते



जयपूरनंतर मंगळवारी नागपुरात आंदोलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी अभिजित म्हणाले, “सोमवारी माझ्यावर हल्ला झाला. माझ्यावर हल्ला करणारे लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. ६ जूनला दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर आंदोलन केले होते, तेव्हाच आम्ही अल्टिमेटम दिला आहे. जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन असेच सुरू राहील. २० जूनला दिल्लीत मोठे आंदोलन होणार आहे. आम्ही शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय परतणार नाही,” असा थेट इशारा अभिजित दिपके यांनी दिला आहे.
”ज्यांना देशातील युवकांची चिंता आहे, त्यांनी या आंदोलनात येऊन सहकार्य करावे. जे माझे मित्र आहेत, ते मला सहकार्य करत आहेत. मी महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना मानतो. माझ्यावर जर कोणी हात उगारला, तरी मी हात उचलणार नाही. आंदोलनाचा मूळ मुद्दा भरकटवण्यासाठीच असे हल्ले केले जातात. सर्वांनी सहकार्य करून या आंदोलनात सहभागी व्हावे,” असे आवाहन अभिजित यांनी केले. “महाराष्ट्रात दोन मोठे पक्ष फोडले गेले. बंगालमध्ये पक्ष फोडला, मतदान ‘डिलीट’ केले जात आहे. जिथे मतदान डिलीट होते, तिथे एका विशिष्ट पक्षाला फायदा होतो. भगतसिंग, राजगुरु यांनी आंदोलन केले असते, तर आज त्यांनाही देशद्रोही ठरवले गेले असते,” असे परखड मत अभिजित यांनी व्यक्त केले.