
महाराष्ट्र संवाद न्यूज –
स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून मुंबईतील रिलायन्स कॉर्पोरेटच्या मॅनेजरला चार लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी शेवगाव येथील शिवसेनेच्या नवप्रविष्ट महिला नेत्या विद्याताई जावेद गाडेकर आणि त्यांचे पती जावेद यासीन पठाण यांच्याविरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण… अतुल नामदेव अटकळे (वय ३७, रा. जुना ठाणे शहर), रिलायन्स कॉर्पोरेटचे मॅनेजर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २३ डिसेंबर २०२० रोजी जावेद यासीन पठाणने अटकळे यांना त्यांच्या विद्यानगर येथील घरी बोलावले. त्यावेळी त्यांची पत्नी विद्या गाडेकरही उपस्थित होत्या. पठाणने त्यांना घरातील चैतन्य कानिफनाथ मढी यांच्या गादीचे दर्शन घ्यायला लावले आणि घरातील सोन्याचे दागिने दाखवून आपला सोने विक्रीचा व्यवसाय असल्याचे सांगितले. मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत असल्याने इतरांना कमी दरात शुद्ध सोने विकून फायदा करून दिला आहे. जास्तीत जास्त पैशांची गुंतवणूक केल्यास कमी दरात सोने देईन, असे आश्वासन त्याने अटकळे यांना दिले.

४ लाखांची फसवणूक… या आमिषाला बळी पडून अतुल अटकळे यांनी १५ जानेवारी २०२१ रोजी २ लाख रुपये आणि २३ जानेवारी २०२१ रोजी आणखी २ लाख रुपये असे एकूण ४ लाख रुपये IMPS द्वारे गाडेकर यांच्या खात्यावर वर्ग केले. मात्र, त्यानंतर दोघांनीही सांगितल्याप्रमाणे शुद्ध सोने दिले नाही. कोविडमुळे अटकळे यांना शेवगावला येता आले नाही. या काळात त्यांनी वारंवार फोन करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी फोन घेतले नाहीत आणि टाळाटाळ केली. गुंतवणूक केलेले पैसेही परत केले नाहीत. प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ केली. पैसे परत मागितल्यावर “तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल करू आणि जेलमध्ये टाकू” अशी धमकीही दिल्याचे अटकळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
गुन्हा दाखल… या प्रकरणी विद्याताई जावेद गाडेकर आणि जावेद यासीन पठाण यांच्याविरोधात फसवणूक, मारहाण, धमकी आणि सामूहिक सहभाग अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रवीण महाले या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.


