

संगमनेर, प्रतिनिधी:
संगमनेर शहरातील भूमिगत गटार दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या अतुल पवार यांच्या कुटुंबीयांना आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते ३० लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचे पत्र सुपूर्द करण्यात आले. यावेळी आमदार खताळ यांनी मदतीचे आश्वासन देतानाच, या घटनेतील दुसरा मृत रियाज जावेद पिंजारी यांच्या कुटुंबीयांनाही शासनाच्यावतीने भरीव मदत मिळवून देणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
शनिवारी आमदार खताळ यांनी मदिनानगर येथील जावेद पिंजारी आणि संजय गांधीनगरमधील रतन पवार यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.
संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोडवरील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलजवळ भूमिगत गटाराच्या चेंबरमधील मैला काढताना अतुल पवार याचा मृत्यू झाला, तर त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताना रियाज पिंजारी यालाही जीव गमवावा लागला होता तर या घटनेत आणखी दोघेजण जखमी झाले होते.
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच, आमदार खताळ यांनी तात्काळ नगरपालिका मुख्याधिकारी आणि पोलीस प्रशासनाला गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
आमदार खताळ यांनी सांगितले की, अतुल पवार यांच्या कुटुंबाला मिळालेली मदत आणि रियाज पिंजारी यांच्या कुटुंबीयांनाही भरीव स्वरूपाची मदत कशी देता येईल, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. शासन दरबारी दोन्ही कुटुंबांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारास लवकरात लवकर अटक व्हावी, अशी मागणी मयत तरुणांच्या नातेवाईकांनी खताळ यांच्याकडे केली. यावर बोलताना खताळ यांनी, गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, अटक होणारच आहे. कितीही जामिनासाठी प्रयत्न केले तरी कायद्यापासून कोणीही पळू शकणार नाहीत.खताळ यांच्यासोबत महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.



या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच,
