

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त
संगमनेर, प्रतिनिधी:
संगमनेर येथील भूमिगत गटार दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या अतुल पवार आणि जावेद पिंजारी यांच्या कुटुंबीयांची काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी भेट घेऊन सांत्वन केलं. या दोन्ही कुटुंबांना सरकारकडून तातडीने आणि जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन थोरात यांनी दिलं.
कोल्हेवाडी रोड येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेनंतर थोरात यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, विश्वास मुर्तडक, नितीन अभंग, निखिल पापडेजा, गणेश मादास, जावेद पठाण, लाला बेपारी, अंबादास आडेप, वैष्णव मुर्तडक, किशोर टोकसे यांच्यासह शहरातील विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
नगरपालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे घडली दुर्घटना
थोरात म्हणाले, घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. नगरपालिका प्रशासनाचा निष्काळजीपणा याला कारणीभूत आहे. काम अपूर्ण असताना या युवकांना स्वच्छतेसाठी पाठवण्याची खरंच गरज नव्हती. ही घटना हृदय हेलावणारी असून, अतुलला वाचवण्यासाठी जावेद पुढे सरसावला आणि दुर्दैवाने दोघांचाही मृत्यू झाला, असं त्यांनी नमूद केलं. या दोन्ही कुटुंबांना शासन स्तरावरून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री आणि सरकारकडे आपण पाठपुरावा करून तातडीने मदत मिळवून देऊ, असं आश्वासन त्यांनी दिलं.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनीही या घटनेसाठी नगरपालिका प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचं म्हटलं. काम अपूर्ण असताना ही जोडणी करायला नको होती, असं ते म्हणाले. या घटनेचं राजकारण न करता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून या कुटुंबांना जास्तीत जास्त मदत मिळवून दिली जाईल, असं तांबे यांनी स्पष्ट केलं. डॉ. जयश्री थोरात यांनीही दोन्ही कुटुंबांतील महिलांचं सांत्वन केलं.
यावेळी कार्यकर्ते, परिसरातील नागरिक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनीही
